नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा मानवता की दिवाली हा उपक्रम स्तुत्य असून रोटरीच्या विविध उपक्रमामुळे फुलसरा या गावाला दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. त्या रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या ‘मानवता की दिवाली’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लायन्सच्या माजी प्रांतपाल डॉ.तेजल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, फुलसरा गावाचे सरपंच महेंद्र नाईक, उपसरपंच वंदना रमेश नाईक, पोलीसपाटील रमेश मोतीराम नाईक, ग्रामपंचायत सदस्य छोटूनाईक, तसनीम जलगुणवाला, पायल जैन, रिचा जैन, खुशबू जैन आदी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर ’मानवता की दिवाली’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात नंदुरबार परिसरातील गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते. या वर्षी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने आनंदग्राम योजना अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील फुलसरा हे गाव दत्तक घेण्यात आले असून त्या गावी ‘मानवता की दिवाली’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात मिठाई, फरसाण, रांगोळी, दिवे, कपडे, साड्या, तेल, साखर, गूळ, आकाश कंदील, जाळी आदींची एक कीट तयार करून देण्यात येत असते. या वर्षी फुलसरा गावात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सदर किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात एकूण १०२ कुटुंबाना सदर किट देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्हा पिरषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न बघा व स्वप्नपूर्तीसाठी शिक्षणावर भर द्या असे आवाहन केले.
तसेच गावातील विद्यार्थ्यांचे एज्युकेशन कॉन्सलिंग होणे गरजेचे आहे त्यातूनच विद्यार्थ्यांना भविष्यात करियर घडविण्यासाठी मदत होईल असे देखील सांगितले. या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बोहरी समाजाची पहिली वैमानिक झालेली सारा मोईज मर्चंट यांचा देखील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर यांनी केले. आभार नीरज देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितीश बांगड, इसरार अली सैय्यद, प्रवीण पाटील, पार्थ चौधरी, अनिल शर्मा, विजय बडगुजर, अली मर्चंट, उमेश जैन, किरण दाभाडे, विकास तोषनीवाल, प्रवीण येवले , जितेंद्र सोनार , जुझर बोहरी, मुर्तूझा वोरा, अब्बास काटावाला आदींनी परिश्रम घेतले.