नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी 1 नोव्हेंबर सकाळी 6 वाजेपासून 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदरचे मनाई आदेश संपूर्ण जिल्ह्याला लागू राहतील.
या काळात सोटे, तलवारी, बंदूका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरता येणार नाही. तसेच अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरता येणार नाही. दगड अगर अस्त्रे, सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे किंवा बरोबर नेणे यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहे.
सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे भाषण करणे, हावभाव करणे अथवा सॉंग आणणे असे प्रकार करता येणार नाही. याचबरोबर जाहिरपणे घोषण देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे अगर दहन करणे या आदेशाचे उल्लंघन समजले जाईल.
या मनाई हुकुमान्वये पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा त्यांनी अधिकार प्रधान केलेले इतर अधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या जमाव जमणेस किंवा मिरवणुकीस या आदेशात मनाई आहे. सदरची परवानगी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बघून देण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्यात 8 नोव्हेंबर 2023 ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत धडगांव येथे श्री. अस्तंबा यात्रा भरते. वसुबारसपासून भाविक सातपुड्यातील अस्तंबा शिखर चढण्यास सुरुवात करतात व लक्ष्मीपुजनाचे दिवसापावेतो घरी परत येत असतात. सदर यात्रेस मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच तळोदा पोलीस ठाणे हद्दीत मोरवड (रंजनपूर) येथे दिवाळीच्या दिवशी संत गुलाम महाराज व संत रामदास यांचे समाधीस्थळी आरती पूजन कार्यक्रम (आदिवासी मेळावा) कार्यक्रम होत असतो.
सदर कार्यक्रमासही महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. तसेच सध्याचे महाराष्ट्र राज्यातील सध्याचे राजकीय व सामाजिक वातावरण बघता जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे धरणे, मोर्चे, बंद इत्यादी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वैयक्तिक व सामूहिकरीत्या आमरण / लाक्षणिक उपोषण करण्यात येतात. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी मनाई हुकूम जारी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास मनाई आहे. करीता या कालावधीत असा जमाव जमल्यास त्यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या बाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पी.आर.पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार








