नंदुरबार । प्रतिनिधी
जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची नितांत आवश्यकता असुन छत्रपती शाहु महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत वसतीगृह निर्माण करण्यात यावे या मागणीचे निवेदन नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आपल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणासाठीच्या संविधानिक न्याय व हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला होता आणि आहे.परंतु आजपर्यंत कुठल्याही राज्य सरकारने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा न्याय मिळवुन दिलेला नाही.त्यामुळे मराठा समाजातील गरीब व होतकरु विद्यार्थी हतबल होवुन नैराश्याकडे वाटचाल करीत आहेत. बहुतांश मराठा बांधव रोजगारासाठी गुजरातकडे व मोठ्या प्रमाणात शहराकडे छोटया -छोटया रोजगारासाठी जात आहे.
या नैराश्यातुन बाहेर काढुन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील विद्यार्थ्यांना एस.सी.,एस. टी. व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांची नितांत आवश्यकता असुन छत्रपती शाहु महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत वसतीगृह निर्माण करुन ते नियमित करावे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेन व याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी ताराचंद शिंदे, रोहिदास साळुंखे, कृऊबा संचालक अमृत गायकवाड, सरपंच राजू पांगारे, उपसरपंच प्रशांत हराळ, ग्रा.पं.सदस्य धनराज भवर, ग्रा.पं.सदस्य धनराज कदम , उपसरपंच शरद गवळी, प्रल्हाद बोराणे, सुभाष पवार, ज्ञानेश्वर कदमबांडे , ॲड.मोहन पवार, पत्रकार हिरालाल मराठे, ज्ञानेश्वर मोठे, दत्तू वाळे, देवा वाळे, गोपाल शेळके, संदीप वाळे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर शिंदे, रघुनाथ नवाळे, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.