नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील टॅक्सी मालक व चालक यांनी महिलांना बस मध्ये ५० टक्के तिकीट भाड्यात सवलत दिल्यामुळे टॅक्सी परवानाधारकांना आर्थिक संकट ओढवले गेले असल्यामुळे टॅक्सी मालक -चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. टॅक्सी मालक-चालक संघटना नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा ,तळोदा या चारही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग सोनार, सचिव बापू माळी, शहादा संघटनेचे अध्यक्ष अरुण चौधरी, तळोदा संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे, अक्कलकुवा संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक बलोच यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही १९९० पासून परवानाधारक टॅक्सी धुळे ,शहादा, अक्कलकुवा, तळोदा यासह विविध ठिकाणी प्रवासी सेवा करीत आहोत मात्र शासनाने महिलांना बस मध्ये ५० टक्के तिकीट भाड्यात सवलत दिल्यामुळे टॅक्सी परवाना धारकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासन नियमाप्रमाणे आम्ही पर्यावरण कर ,व्यवसाय कर, दरवर्षी गाड्यांची पासिंग नियमांचे पालन करून प्रवासी सेवा देत आहोत. परंतु वर्तमान सरकारने महिलांना ५० टक्के भाड्यात सवलत जाहीर केल्यामुळे आमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात साधारण परवानाधारक ११० च्या वरती टॅक्सी आहेत .यासोबत अन्य खाजगी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी देखील आहेत यामुळे चार हजाराच्या वरती लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिलांना सवलत तसेच यापूर्वी ७५ वर्षावरील प्रवासीना देखील सवलत दिल्यामुळे ते देखील आमच्या वाहनांवर प्रवास करीत नाहीत. आमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून गेल्या ३० वर्षांपासून सतत चालणाऱ्या वाहतूक व्यवसाय बंद पडेल की काय अशी भीती वाटते. याच्या परिणाम आमच्या दैनंदिन जनजीवनावर होत आहे. मुलांच्या शिक्षणासह आरोग्य व दैनंदिन खर्च तसेच कर्जाने घेतलेल्या गाड्यांचे मासिक हप्ते भरण्यावर परिणाम होत आहे कर्जबाजारी होण्याची भीती नाकारता येत नाही .कौटुंबिक समस्या उभ्या राहून आर्थिक संकटामुळे कुटुंब उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती आम्हास वाटत आहे.
महाराष्ट्र शासनाने टॅक्सी चालकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. त्याच्या फायदा परवाना टॅक्सी चालक-मालक यांना महामंडळाच्या फायदा होईल याबाबत आपण आपल्या पदाचा उपयोग करून आम्हास न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे