शहादा l प्रतिनिधी
सातपुडा (नागाईदेवी) कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्रा बाहेरील सर्व ऊस उत्पादकांना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी संचालक मंडळाच्या वतीने या गाळप हंगामातील ऊस गळीताबाबत शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे.
त्यानुसार गाळप हंगाम 2022-23 साठी ऊस नोंद केलेल्या व ऊस नोंद न केलेल्या ऊस उत्पादकांना निवेदनाव्दारे कळविले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आपल्या सर्वाचा हक्काचा कारखाना श्री नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेड ( श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुरुषोत्तमनगर) सालाबादाप्रमाणे परिसरातील कारखाने बंद झाल्यानंतरही ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन सुरू आहे.तसेच गेल्या आठवड्यात सतत अवकाळी पाऊसामुळे सर्व शेतक-यांचे मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान झाले आहे.ऊस उत्पादकांबरोबर ऊस तोडणी मजुरांचे तद्वतच कारखान्याचेही पावसामुळे (ओले क्षेत्रामुळे) पुरेसा ऊस पुरवठा होत नसल्यामुळे आर्थीक नुकसान होत आहे.
तरी देखील परिसरातील ऊस उत्पादकांच्या विनंतीनुसार सर्व नोंद- बिगर नोंद ऊस गाळपास घेत आहोत.नोंदीचा- बिगर नोंदीचा ऊस रस्त्यांच्या अडचणीमुळे, कौटुबिक अथवा इतर कायदेशीर कारणास्तव किंवा अन्य तत्सम कारणाने ऊस शेतात शिल्ल्क असल्यास अशा शेतक-यांनी कारखानाच्या जवळच्या शेतकी विभागीय कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधून आपला ऊस स्वतः तोडणी व वाहतुक करून येत्या आठवडयाअखेर ऊस गाळपासाठी पोहोच करावा. अन्यथा सदरचा ऊस गळीतास न आल्यास अथवा गाळपाअभावी शिल्लक राहिल्यास त्याचे होणारे सर्वस्वी नुकसानीस कारखाना तसेच शासन जवाबदार राहणार नाही. याची संबंधित ऊस उत्पादकांनी नोंद घ्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.