नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून रखडला आहे. पदोन्नतीची वाट पाहून अनेक जण सेवानिवृत्त झाले आहे. प्रत्येक सभेमध्ये शिक्षण विभागाकडून मुदत मागून वेळ मारून नेली जात आहे. याबाबत जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तर जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी दोन दिवसात पदोन्नतीबाबतचा निर्णय करण्याबाबतचा आदेश शिक्षण विभागाला दिले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती गणेश पराडके, हेमलता शितोळे, संगिता गावीत, शंकर पाडवी, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी विविध विषयाचा आढावा घेत असतांना जि.प.सदस्य भरत गावीत यांनी सांगितले की, शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्या करतांना अवघड क्षेत्रासह सपाटीवर असलेल्या शिक्षकांना रूजू केले. मात्र काही शिक्षकांना रिक्त जागे अभावी रूजू करू शकले नाही.
त्यामुळे एकाचवेळी बदल्या झालेल्या शिक्षकांच्या तारखांमध्ये तफावत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यात दुरूस्ती करण्यात यावी. तसेच काही महिला शिक्षकांना वयाचा ५० वर्षानंतर अतिदुर्गम भागात अवघड क्षेत्रामध्ये पाठविण्यात आले. ज्या भागामध्ये रस्ते नाही. वाहन जात नाही. अशा ठिकाणी या महिला शिक्षिका कशा कर्तव्य बजावणार असा प्रश्न जि.प.सदस्य भरत गावीत यांनी उपस्थित केला. तसेच नवापूर तालुक्यात फळपिकाचे नुकसान झाले असून प्रमुख अंबा पिकाचा नुकसान झाले आहे. भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने करावा अशी मागणी भरत गावीत यांनी केली.
तसेच नवापूर तालुक्यात जॉबकार्ड दिले जात नाही. या जबाबदार असणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी शिक्षण विभागाचा आढावा घेत असतांना पदोन्नतीची वाट पाहून शिक्षण विभागातील अनेकजण सेवानिवृत्त झाले आहे. शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेमध्ये वाढीव मुदत मागून वेळ मारली जाते. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी नाराजी व्यक्त करत अनेकजण पदोन्नतीची वाट पाहून सेवानिवृत्त झाले आहे. यामुळे पदोन्नती नेमकी कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला.
शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी आता प्रक्रिया किंवा वाढीव वेळ न मागता दोन दिवसात पदोन्नतीबाबत निर्णय करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. दरम्यान जि.प.ऐश्वर्या रावल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या सौर उर्जेचे दिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने ते सुरू करण्यात यावे अशी मागणी केली.
जिल्हा परिषदेच्या सभेत विरोधकांनी केला सभात्याग
नंदुरबार जि.प.चे सर्वसाधारण सभा यामोगी सभागृहात आज दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र दुपारी ३.१५ वाजेपर्यंत देखील सभा सुरू न झाल्याने वेळेवर सभासुरू होत नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस विरोधी पक्षनेते रतन पाडवी, ऍड. सीमा पाडवी, निर्मला राऊत यांच्यासह कॉंग्रेसच्या जि.प.सदस्यांनी सभात्याग करीत वॉकआऊट केले. याबाबत रतन पाडवी यांनी सांगितले की, प्रत्येकवेळी सभा उशिराने सुरू होते. सभेच्या अजेंठयावर दिलेल्या वेळेस सव्वातासाचा कालावधी उलटून देखील सभा सुरू झालेली नाही. अनेक सदस्य दुर्गम भागातून वेळेवर येतात. परततांना उशिर होत असल्याने अनेक अडचणी येतात. यामुळे आज सभा देखील उशिराने होत असल्याने सभात्याग करीत असल्याचे रदतन पाडवी म्हणाले, विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर अवघ्या चार मिनीटांनी (३.१८ मिनीटे) अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह सभापतींचे आगमन झाले. यावेळी अध्यक्षांना बरे नसल्याने सभा उशिराने सुरू झाल्याचे योवळी सांगण्यात आले.