शहादा l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात सामाजिक,राजकीय आणि साहित्यिक क्षेत्रात अग्रेसर व शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शहाद्यातील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात सेवारत हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. विजयप्रकाश ओमप्रकाश शर्मा यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 51 हजार सन्मान राशी, गौरव पत्र व सन्मानचिन्ह असे असून लवकरच मुंबईत त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल.
केवळ नंदुरबारच नव्हे तर उभ्या खानदेशातील व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात सुपरिचित असलेले प्रा. डॉ. विजयप्रकाश ओमप्रकाश शर्मा ज्ञानार्जनाची व ज्ञानार्पणाची कास,आस व आच असणारे प्रतिभावंत खानदेश पुत्र असून गत 27 वर्षापासून हिंदी अध्यापन करीत आहेत. उत्कृष्ट वक्ता, कवी,निवेदक, साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकप्रिय आहेत.उत्तर प्रदेशची सांस्कृतिक व साहित्यिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले बदायूं शहर हे डॉ.शर्मा यांच्या पूर्वजांचे मूळ वतन आहे.डॉ. शर्मा यांचे आजोबा पंडित शिवशंकर शर्मा हे उद्योग व्यवसाया निमित्त बदायूं येथून दिल्ली आणि नंतर महाराष्ट्रात स्थायिक झाले.आर्य समाजाचे अनुयायी व स्वातंत्र्यसैनिक असलेले पंडित शिवशंकर शर्मा फारसी,अरबी,उर्दू,हिंदी आणि मराठी भाषांसह सर्व धर्मग्रंथांचे जाणकार होते. डॉ.शर्मा यांच्या आई स्व. शीलादेवी या मूळच्या अलिगढ येथील रहिवासी. आईच्या मुखातून बालपणी ऐकलेले श्रीरामचरितमानस, सूरदास,तुलसीदास,कबीर यांची भजने हे अध्यात्मिक भक्ती वांग्मय डॉ. शर्मा यांचे संस्कार बीज आहे. स्वच्छ,सुंदर, मधुर हिंदीचा वारसा डॉ. शर्मा यांना त्यांच्या आई व आजोबांकडून मिळाला.
त्यांनी हा वारसा उत्तमरित्या जोपासत आज समृद्ध केला आहे. डॉ. शर्मा यांनी हिंदी विषयात पदवी,पदव्युत्तर शिक्षणासह एम. ए., एम एड.,एम. फिल., पीएच.डी. या पदव्या संपादित केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्र असलेल्या धुळे,नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात डॉ. शर्मा यांच्या सुमधुर वाणीने सर्वच मंत्रमुग्ध होतात. विद्यार्थिदशेपासूनच डॉ. शर्मा यांनी कला, चित्रकला, काव्य, कथाकथन , रंगकर्म, वक्तृत्व,अभिवाचन, गायन,निवेदन, अध्यापन, संशोधन या क्षेत्रात नेहमीच यशस्वी सहभाग नोंदविला व आपली सर्वस्पर्शी प्रतिभा सिद्ध केली.
संस्कार समृद्ध कौटुंबिक परिवेश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व जिल्हा संघचालक व परिसरातील सामाजिक, आध्यात्मिक,पर्यावरण रक्षण चळवळीत अग्रेसर पितृस्थानी असलेले त्यांचे मोठे बंधू अजयजी शर्मा व आपल्या वर्तन आणि विचारांनी माहेर आणि सासर असे दोन्हीकडील कुटुंब समृद्ध करणाऱ्या उच्चविद्याविभूषित चार बहिणी असा संस्कारसंपन्न परिवेश डॉ. शर्मा यांना लाभला आहे. प्रतिभावंतांचा जीवनप्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यतच, डॉ. शर्मांचा यशाचा आणि मान्यतेचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. त्यांचे पितृछत्र बालपणीच हरपले. पितृस्थानी ज्येष्ठ बंधू अजय शर्मा यांनी कुटुंब सांभाळले व भावंडांना उच्च विद्याविभूषित केले. डॉ. शर्मा यांच्या उच्चविद्याविभूषित सहधर्मचारिणी सौ. वंदनादेवी यांनी दोन्ही कुळांचा गौरव व संस्कार सांभाळीत डॉ.शर्मा यांना संकट काळात उत्तमरित्या साथ दिली आहे. उभयतांच्या संसार वेलीवरील फुले पुत्र शुभम व कन्या संस्कृती. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी “या उक्तीप्रमाणे कन्येने अभियांत्रिकी विद्याशाखेत विद्यार्जना सोबतच वक्तृत्व,गायन, नृत्य, निवेदन या क्षेत्रातही लौकिक प्राप्त केला आहे.
स्वामी विवेकानंदांचा आदर्श आपल्या जीवनात ठेवणाऱ्या डॉ.शर्मा यांनी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानत विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाची दिशा शोधण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शहादा परिसरात शिक्षणाची गंगा आणणारे भगीरथ स्वातंत्र्य सेनानी,सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या शैक्षणिक गुरुकुलाचे प्रतिनिधी असण्याचा डॉ. शर्मा यांना सार्थ अभिमान आहे.गत 27 वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून डॉ.शर्मा यांनी स्वामी विवेकानंद व युवाशक्ती, राष्ट्रभाषा हिंदी, राष्ट्रीय एकात्मता, कन्या भ्रूण रक्षण व कन्या जन्म स्वागत, राष्ट्रीय चरित्र निर्माण अशा विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत .राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक काव्य व साहित्य संमेलने आणि आकाशवाणी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी काव्य व कथांचे सादरीकरण देखील केले आहे. आजच्या युवा पिढीसाठी त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी असा आहे.
गौरवास्पद शैक्षणिक कार्य:
प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांचा शैक्षणिक प्रवास व कार्य गौरवास्पद आहे.27वर्षापासून अध्यापन क्षेत्रात प्रसिद्धीपासून दूर राहून निगर्वीपणे व्रतस्थ भावनेने कार्य करीत राहण्याचा आदर्श त्यांनी जपला आहे.आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र अद्वितीय, संपूर्ण व स्वयंपूर्ण करणे हाच ते आपला जीवन धर्म मानतात. अनेक कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रांमध्ये सातत्याने सहभाग घेणारे डॉ. शर्मा उमविच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्र समितीचे सदस्य, महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी ‘वाचन प्रेरणा व ग्रंथ परिचय’ उपक्रमाचे समन्वयक, प्राध्यापक प्रबोधिनी आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक, महाविद्यालयातील वादविवाद, वक्तृत्व, वांग्मय अशा विविध समितीचे संयोजक , श्री पी.के .अण्णा पाटील फाउंडेशनचे सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य करीत आहेत.
राष्ट्रभाषा हिंदी प्रचार प्रसारात योगदान
राष्ट्रभाषा हिंदी संबंधित विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील संघटनांचे पदाधिकारी व सदस्य म्हणूनही डॉ.शर्मा सेवा बजावत आहेत . महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पूर्व सदस्य तसेच भारत सरकारच्या सूचना आणि प्रोद्योगिकी मंत्रालयाच्या अधीन दूरसंचार विभाग हिंदी सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. कर्नाटक महिला हिंदी सेवा समिती बेंगलुरुचे आजीवन हिंदी प्रचारक सदस्य, भारतीय हिंदी परिषद प्रयागराज, महाराष्ट्र हिंदी परिषद,उत्तर महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषद, भारतीय शिक्षण मंडळ -नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य म्हणून त्यांची कामगिरी अभिनंदनीय आहे.
*विविध संस्थांमध्ये सक्रियता व सन्मान-* चरैवेती चरैवेती या मंत्राचे उपासक डॉ.शर्मा यांचे कार्य सर्वस्पर्शी आहे. जायन्ट्स इंटरनॅशनल शहादाचे ते आजीव सदस्य असून एड्स जनजागरण, कन्या भ्रूण रक्षण ,गरीब विद्यार्थी सहाय्य या क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. विवेक विचार मंच, राष्ट्रिय सुरक्षा मंच, वन्देमातरम जन्मशताब्दी समिती सदस्य, रंगश्री नाट्यसंस्थेचे रंगकर्मी, शहादा नगरपालिका प्रभाग शिक्षण समितीचे सदस्य, नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमीचे सदस्य या विविध भूमिकांमध्ये त्यांची प्रतिभा सतत विस्तारत गेली आहे . त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची दखल घेत जायंट्स इंटरनॅशनलचा आऊटस्टँडिंग डायरेक्टर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय प्रतिभारत्न प्राध्यापक पुरस्कार, कृष्ण बसंती संस्था उज्जैनचा राष्ट्रीय स्तरावरील अवगत पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींद्वारे स्थापित महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे या संस्थेच्या हिरक महोत्सव समारंभात तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या शुभ हस्ते डॉ.शर्मा यांच्या “राष्ट्रवाणी के साठोत्तरी विशेषांक :एक अध्ययन” या ग्रंथाचे प्रकाशन करून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने त्यांच्या शोध कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने डॉ.शर्मांच्या केलेल्या या सन्माना बद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत असून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ .विजय माहेश्वरी, अकादमीचे कार्याध्यक्ष शितलाप्रसाद दुबे,आमदार राजेश पाडवी,प्रा.प्रकाश पाठक, अजय शर्मा,दिलीप रामू पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील,डॉ.वसंत पाटील, प्रा.डाॅ. सुनिल कुलकर्णी,प्रा.डॉ.गौतम कुवर आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.