नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील आसाणे येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 26 कोटी खर्चाच्या परिसरातील 14 गावांचा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे. या गावांना तापी नदीवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित होत्या. प्रसंगी शरद तांबोळी, सरपंच राजू मराठे , जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.डॉ. गावित म्हणाले की , परिसरातील 14 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून या योजनेसाठी एकूण 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या निधीतून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भूमिगत गटारींचे काम हे करण्यात येणार आहे. आणि ग्रामीण भागातील घरकुलांचा प्रश्न हा येत्या 2024 पर्यंत सर्वांना मिळणार आहे. यात शबरी आदिवासी योजना आणि रमाई घरकुल योजनेतून त्या त्या जमातीच्या लाभार्थ्यांना तसेच इतर लाभार्थ्यांना लाभासाठी जॉबकार्ड तयार करून अर्ज करावेत.

तरच घरकुलांचा लाभ मिळेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले आहे. यावेळी आसाणे ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित आणि विशेष सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खा. डॉ.हिना गावित यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी जलजीवन मिशन योजनेविषयी माहिती दिली तसेच खा.डॉ.हिना गावित यांनी सांगितले की, जल जीवन मिशन ही योजना केंद्र शासन नामार्फत राबवली जात असून यासाठी पाठपुरावा केला होता. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या प्रत्येक गावात जलजीवन मिशन योजना राबवली जाणार आहे अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकनियुक्त सरपंच सिमाबाई शरद पाटील, उपसरपंच मोतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य नारायण पाटील, ग्रा.पं. सदस्या नर्मदा पाटील , ग्रा.पं. सदस्या निर्मला नारायण पाटील व तात्यासाहेब ए. डी. पाटील ग्रुपचे सदस्य, गोकुळ पाटील, बापु पाटील, शरद पाटील, महेश पाटील, दिनेश पाटील, दादाभाई पाटील, संजय पाटील, आबा पाटील,नारायण पाटील, निंबा पाटील, दिनेश पाटील, राके्श पाटील, संजय राजाराम पाटील ईलाचंद पाटील, पत्रकार पंढरीनाथ पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील १३ ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत येणारे गावे घोटाणे, न्याहली, रजाळे, खोक्राळे, भादवड, कार्ली, कंढरे, निंभेल ,बलवंड, सैताणे, खर्दे, तलवाडे बु., वैंदाणे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.








