नंदुरबार | प्रतिनिधी
कृषि विज्ञान केंद्रात १६ वा तंत्रज्ञान महोत्सवाची सुरुवात करण्यात आलेली असून रोजी कापुस उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेती सोबत प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची गरज असण्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र राजेंद्र दहातोंडे यांनी कापूस या महत्वपूर्ण पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कृषि विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या तंत्रज्ञान सप्ताहातील कार्यक्रमाची माहीती दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. हेडगेवार सेवा समितीचे संचालक पाटीलभाऊ माळी यांनी पीक उत्पादनाचा खर्च कमी करून निवळ नफा कसा वाढवता येईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले व तंत्रज्ञान महोत्सवात आयोजित कार्यक्रमांचा शेतकर्यांनी उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
कापुस उत्पादक परिषदेसाठी पाटीलभाऊ माळी, सुखदेव माळी, कृष्णा गांधी, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय डॉ. यु. बी. होले, रेशीम संचनालय आर. पी. जोशी, कांतीलाल पाटील, प्रा. रवींद्र देशमुख, प्रा. विवेक चव्हाण उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात डॉ. यु. बी. होले यांनी कापसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कमी कालावधीचे व रोग किडीला प्रतिकारक वाण लावणे, सापळा पिके लावणे, फरदड न घेणे, वनस्पतीजन्य व जैविक किटक नाशकांचा वापर याविषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावर्षी कापूस पिकात केलेले नवनवीन प्रयोग व त्याचे परिणाम याविषयी विषय विशेषज्ञ पदमाकर कुंदे यांनी माहीती दिली.
कापुस उत्पादक परिषदेत चोपडा येथील प्रगतिशील शेतकरी कांतीलाल पाटील यांनी स्वतः तयार केलेला इकोपेस्ट सापळा, त्याची रचना व त्याला मिळालेले पेटंट याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परिषदेसाठी परिसरातून मोठया प्रमाणावर कापूस लागवड केलेले शेतकरी व दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पदमाकर कुंदे व आभार प्रदर्शन जयंत उत्तरवार यांनी केले.
कृषि पुरक उद्योग परिषद
कृषि उद्योग परिषदेत रेशीम उद्योग विषयी मार्गदर्शन करण्यात आले. विषय विशेषज्ञ पदमाकर कुंदे,यांनी रेशीम शेतीला नंदुरबा जिल्ह्यात असलेला वाव व सद्यस्थितीत केला जाणारा व्यवसाय या विषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमात आर. पी. जोशी, यांनी तुती लागवड, शेड उभारणी, अंडीपुंज, रेजीस्ट्रेशनची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. कृषि उद्योग परिषदेसाठी जिल्ह्यातील तुती लागवड शेतकरी उपस्थित होते.