नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी १ हजार ६६३ विद्यार्थ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. टीईटी गैरव्यवहारप्रकरणी २०१९ चे प्रकरण पूर्ण मिटत नाही तोच १५ ऑगस्ट २०१८ च्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी परिक्षा परिषदेने पुन्हा मोठी कारवाई केली आहे. १ हजार ६६३ विद्यार्थ्यांवर कारवाई करुन या विद्यार्थ्यांची संपादणूक (परीक्षेमूळे मिळणारे सर्व फायदे) रद्द केले आहेत. यातील नोकरीमध्ये असलेल्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यात आलेले विद्यार्थी १५ ऑगस्ट २०१८ च्या परीक्षेतील आहेत.
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आयएएस अधिकारी, आयुक्तांसह अनेकांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. २०१९ मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी ७ हजार ८८० जणांची संपादणूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.त्यासह टीईटी प्रमाणपत्रावर नोकरी मिळवलेल्यांवरही कारवाई करण्यात आली.
यासह दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आणखी १ हजार ६६३ विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा परिषदेने उगारला आहे.अशा विद्यार्थ्यांची यादी करून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील ७७९ उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असतानादेखील अंतिम निकालामध्ये या उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आले. तर ८८४ उमेदवार हे अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या विहीत पध्दतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रक मिळवले आहे. अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. दोन्ही प्रकारातील विद्यार्थ्यांवर परिषदेने कारवाई केली असून त्यांची यादी जाहीर केली आहे.
२०१८ च्या गैरप्रकारातील विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करून यापूढे घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. बनावट प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक वितरित गैरप्रकारातील विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केल्याने शिक्षक पात्रता परीक्षा व नोकरीला कायमचे मुकावे लागेल. जे नोकरीला असतील त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








