नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उद्या दि.१७ ऑक्टोंबर रोजी निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी राज्यातील पॅटर्न वापरला जातो की, स्थानिक पातळीवर वेगळीच आघाडी होते. याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मुदत संपली होती. त्यांना मुदतवाढ मिळाली होती. दि.१७ ऑक्टोंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा परिषदेत ५६ सदस्य त्यात कॉंग्रेस पक्षाकडे २४, भाजपकडे २०, राष्ट्रवादी ४ व शिवसेनेकडे ८ सदस्य आहे.
त्यातही सर्व पक्षांमध्ये गटबाजीचा प्रभाव आहे. राज्यात भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना हे एकत्रित सत्तेत आहे. मात्र नंदुरबारमधील स्थानिक नेत्यांमधील दिशा वेगळी आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत, माजीमंत्री ऍड.के.सी.पाडवी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजीमंत्री ऍड.पद्माकर वळवी यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. आतापर्यंत सर्वच पक्षांतर्फे मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत शहादा व तळोदा येथे कॉंग्रेसला दगाबाजीचा फटका बसला होता. त्यामुळे कॉंग्रेसने सावध पवित्रा घेत या निवडणुकीसाठी जि.प.सदस्यांना व्हीप बजावला आहे. अडीच वर्षापुर्वी कॉंग्रेस, शिवसेना एकत्र येत कॉंग्रेसचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष निवडुण आले होते. अडीच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर राज्यात बदलेल्या राजकारणाचा जिल्हा परिषदेवर परिणाम होवू शकतो.
मात्र नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण पाहता याची शक्यता फारच कमी आहे. मात्र उद्या होणार्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मोठे बदल होण्याचे शक्यतेबाबत चर्चा सुरू आहे. भाजपातर्फे जि.प.सदस्य डॉ.कुमूदिनी गावीत, डॉ.सुप्रिया गावीत तर कॉंग्रेसतर्फे ऍड.सीमा वळवी, गिता पाडवी यांचे नाव आघाडीवर आहे.भाजपाततर्फे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांनी जि.प.अध्यक्षपदासाठी कंबर कसली आहे.
राज्यातील घडामोडी प्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातही घडामोडी घडतील का? जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे राजकारण कसे असेल ते आज घडपणे सांगणे कठीण आहे. या निवडणुकीत कुठला गट कुठला पक्ष कुठल्या नेत्याबरोबर आहे. हे उद्याच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीनंतर नगरपालिकेतील निवडणुकीचे चित्र बरेच स्पष्ट होणार आहे.








