नंदुरबारी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने जिल्हा परिषदेचे प्रशासकीय यंत्रणेने ग्रामसेवकांच्या पूर्ण मागण्या मान्य न झाल्यास दि.२४ ऑगस्ट पासून जिल्हा अध्यक्ष रविंद्र वळवी व जिल्हा सरचिटणीस रत्नाकर शेंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन असहकार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदना नुसार अशी की, दि.७ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने असहकार आंदोलन करण्यात आले होते, मात्र त्यावेळी दि.१७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सकारात्मक बैठकीत दि. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन मिळाले परंतु त्यावर सात महिने उलटूनही एकही प्रश्न मार्गी लागला नसल्याने दि.२४ ऑगस्ट २०२१ पासुन जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक पुनःश्च असहकार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे.
यासोबतच दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.२७ सप्टेंबर २०२१ बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दि. ४ ऑक्टोबर २०२१ राजी पासुन कामबंद व जिल्हा परिषदेचे समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. असे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.