नंदुरबार l

नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे या वर्षापासून गणेशोत्सव काळात गणेश मूर्तींची स्थापना, विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांना गणराया पुरस्कार देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात गणेश मूर्तींची स्थापना, विसर्जन मिरवणुकीचे वेळी मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांना या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी निवड करताना निकषांचा विचार करण्यात येईल. त्यात, गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे,
उत्कृष्ट देखावा सादर करणे. वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबवणे, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे बसवणे, पोलिस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ आदी निकषांचा विचार करुन पुरस्कारांसाठी मंडळांची निवड करण्यात येईल. गणेश मूर्तींची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत तसेच मोठ्या मंडळांच्या ठिकाणी स्थापना काळात भक्तांच्या दर्शनासाठी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.
त्यात महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलीस मोबाईल व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ असे ५ पुरस्कार देण्यात येतील. याबाबत प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर वकील, प्राध्यापक, डॉक्टर यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती सर्व मंडळांचा आढावा घेवून पुरस्काराची शिफारस करेल. तसेच हा पुरस्कार पारदर्शीपणे देण्यात येईल, अशी माहितीही जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे









