नंदूरबार l प्रतिनिधी
जि प केंद्र शाळा वाण्याविहीर, ग्रुप ग्रामपंचायत वाण्याविहीर खु आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी काढण्यापूर्वी शालेय आवारात सभा भरवण्यात आली.
सभेत उपस्थित ग्रामस्थांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची माहिती, महत्व, ध्वजारोहणचे महत्व, ध्वजाची संहिता सांगण्यात आले. दि १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रध्वज कुठे व कोणामार्फत उपलब्ध केला जाणार, ध्वजारोहण कसे करावे, त्याची काळजी व सुरक्षा विषयक सविस्तर माहिती व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे यांनी केले. त्यानंतर ग्रामस्थांनी शालेय आवारात वृक्षारोपण करून घरोघरी तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली.
प्रसंगी कार्यक्रमात माजी सरपंच अशोक पाडवी, माजी ग्रा.पं.सदस्य प्रदिप पाडवी, शा.व्य.स.अध्यक्ष नरेश पाडवी, शिक्षणतज्ञ सुनिल पाडवी, ग्रामसेवक जी ए पाडवी, मुख्याध्यापक बालाजी केंद्रे, सहशिक्षक विलास पवार, योगिता मांडवडे, शा व्य समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.