नंदुरबार l प्रतिनिधी
तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदीपत्रात विसर्ग करण्यात आला असून तापी नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एकुण १,४१,०८८ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच सुलवाडे बॅरेज प्रकल्पातून येत्या २४ तासात १.५०,००० क्युसेक्स इतका मोठा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो.
तरी संभाव्य पूर परिस्थिती लक्ष्यात घेता व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ४ द्वार पूर्ण क्षमतने उघडुन ४२,६७० क्युसेक्स आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ५ द्वार पूर्ण क्षमतेने उघडुन ५९.६०९ क्युसेक्स इतका विसर्ग काल रात्री १० वाजेपासून तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच पाण्याचा येवा लक्षात घेता वरील प्रकल्पांतून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे तापी नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.








