नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कळंबू येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याच्या विविध वस्तू लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सारंगखेडा पोलिसात एक लाख रोख चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार साडे पाच लाख रोख व २५ तोळे सोने चोरीला गेले आहे.मात्र त्याची नोंद करण्यात आलेली नाही याबाबत काय गौडबंगाल आहे असा प्रश्न दबक्या आवाजात नागरिक करीत आहेत.
याबाबत अधिक माहितीनुसार शहादा तालुक्यातील कळंबू येथील माजी पोलीस पाटील भास्कर दगा बोरसे व महेंद्र पाटील हे काका, पुतण्या स्वतःच्या शेतात रात्रपाळीची लाईट असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी गेल्याची संधी साधत यांच्या पाटील वाड्यातील जुन्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करत
धाडसी चोरीची घटना ता. ९ रोजी सकाळी उघडकीस आली, यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे. ता. ८ बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील पत्र्याच्या कपाटामधून एक लाखाच्या रक्कमेसह वीस तोळे वजनाच्या इतर सोन्याच्या विविध वस्तू चोरून नेल्या,
भास्कर बोरसे यांच्या मुलाचे गेल्या महिन्याभरा पूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे कपाटात विविध किमती सोन्याच्या वस्तू होत्या, मात्र श्री. पाटील यांच्या सून माहेरी गेल्याने, नेमके दागिने किती? याबाबत चोरी झालेल्या दागिन्यांचा व रक्कमेचा आकडा वाढू शकतो, त्यानंतरच सविस्तर रक्कमेची माहिती मिळू शकेल,
मात्र सध्या याबाबत सारंगखेडा पोलिसात एक लाख रोख चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत फिर्याद भास्कर बोरसे यांनी दिली असून तपास पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ स्वतः करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गावात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून गावातील तीन दुचाकीसह लहान मोठ्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात आला. घटनास्थळाच्या घरासमोरील पडक्या जागेतून चोरटे पसार होऊन पुढे गावाच्या मागच्या पश्चिमेकडील बाजूने येथील तालुका बीज गुणन केंद्रापर्यत श्वान पथकाने माग काढला, मात्र पुढे कळंबू, सारंगखेडा रस्त्यालगत चोरटे अज्ञात वाहनाने प्रसार झाल्याचा अंदाज श्वान पथकाने वर्तविला.
मात्र श्वान पथकाच्या हाती काहीही नलागल्याने खाली हात परतावे लागले, पथकामध्ये पोलीस हवालदार दिलीप गावित, हवालदार सुखलाल गावित, (श्वान ऐंजल,) वाहन चालक हेमंत गिरासे आदी पथकाने माग काढला.
याबाबत सारंगखेडा पोलिसात एक लाख रोख चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार साडे पाच लाख रोख व २५ तोळे सोने चोरीला गेले आहे.मात्र त्याची नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत काय गौडबंगाल आहे असा प्रश्न दबक्या आवाजात नागरिक करीत आहेत याबाबत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक पी. आर.पाटील यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी आहे.