नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष पूर्ण झाले असून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्यात गेल्या आठ वर्षात शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली.
भाजपाने केंद्रामधील आठ वर्ष पूर्ण केली असून याबाबत माहिती देण्यासाठी खा.डॉ.हीना गावित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, गेल्या आठ वर्षात नंदुरबार जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे. खान्देश एक्स्प्रेस सुरु करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. यापुढे पुण्यासाठीही एक्स्प्रेस सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून १२ लाख लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतून शहरी भागासाठी २ हजार ३६१ तर ग्रामीण भागासाठी ९६ हजार ७४३ घरांना मंजूरी देण्यात आली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २ लाख ७१ हजार ८४५ स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. हर घर नल से योजनेंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून २०२३ पर्यंत १ लाख ४८ हजार ८७२ तर २०५३ पर्यंत २ लाख ४९ हजार ४३६ घरांना नळ जोडणी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून २ हजार ७७२ फेरीवाल्यांना ३.५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३४ हजार ८९२ आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी असून यातील २ लाख २९ हजार ५१९ कार्ड वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ११ लाख २० हजार १९७ जणांना पहिला डोस तर ७ लाख ६१ हजार ८८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ११५ लाभार्थ्यांना ७८ कोटीहून अधिकची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेतून ३ कोटी ७४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेतून देशात सर्वाधिक गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून ५ लाख ७८ हजा ८३६ महिलांचे बॅक खाते उघडण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली. यासह विविध योजनांचा आकडेवारीसह आढावा सादर केला. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते.