नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या विविध प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री दर्शना जरदोश यांनी दिल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांकडून या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लवकरच वडोदरा- वलसाड, सुरत-भुसावळ पॅसेंजर, अहमदाबाद- मुंबई सेंट्रल पॅसेंजर गाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे दैनंदिन अप-डाऊनसह सुरतहून गुजरात आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गाड्या बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारतात कोरोना महामारीने दार ठोठावताच केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. यादरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली.
परिस्थिती सामान्य झाल्याने आता रेल्वे प्रशासनाने पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वीप्रमाणेच गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजरसह 6 पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनानेही या गाड्या पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.