नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा वाण्याविहिर येथे आय ए.एच.व्ही आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्गखोल्यांचे नूतनीकरण व रंगरंगोटी तसेच मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण झालेल्या वास्तूंचा उपरोक्त संस्थेतर्फे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास अक्कलकुवा तालुक्याचे गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर निकुंभ, केंद्रप्रमुख मोहन बिसनारीया, केंद्रप्रमुख ललिता भामरे, माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई सैंदाने, वाण्याविहीरचे माजी सरपंच अशोक पाडवी, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश पाडवी उपाध्यक्ष पूनमताई सैंदाने, शिक्षणतज्ञ सुनील पाडवी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेपासून स्वामी नारायण मंदिरापर्यंत आदिवासी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पेहराव केलेल्या मुली नृत्य करत स्वागताला पुढे आल्या. अतिथींचे औक्षण करत स्वागत करण्यात आले. फटाके वाजवण्यात आले. अतिथींनी आदिवासी संस्कृतीचे कौतुक करत ढोलच्या ठेक्यार ताल धरला. ढोल वाजवत व नृत्य करत शाळेच्या सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या कंपनी सेक्रेटरी आदिती खांडेकर व आय ए एच व्ही चे अंकुर गुप्ता यांनी वर्गखोल्यांचे फीत कापून उद्घाटन केले. वर्गखोलीत मॅडमांनी मुलांना इंग्रजी वाचन करण्यास सांगितले. मुलांनी देखील उत्साहात वाक्य वाचन केले. वर्गखोलीतील पेंटिंग्ज चे कौतुक केले. पाठ्यपुस्तकातील घटक भिंतीवर कोरल्याने त्यांना विशेष आनंद झाला. त्यानंतर मुला-मुलींसाठी स्वतंत्र बांधलेल्या स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले. तेथील सोयीसुविधा बाबत माहिती घेतली.
अतिथींनी दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन केले. अंजना कलाल आणि देवमोगरा येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि बांबूपासून बनवलेल्या भेटवस्तू देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. नावाचे बिल्ले लावण्यात आले. अक्कलकुवा तालुक्याचे गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी उपरोक्त संस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले त्याचबरोबर शाळेला पाण्याची अतिरिक्त १००० लिटर क्षमता असलेली टाकी उपलब्ध करून देऊ असे सूतोवाच केले. पंचायतराज कमिटीने वर्गखोल्यांचे नूतनीकरण करण्याबाबत सुचविले होते त्याचा पाठपुरावा करत शाळेतील शिक्षकांनी भौतिक सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच भविष्यात अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांना या संस्थांनी सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त केली. आदितीजी खांडेकर यांनी आदिवासी संस्कृतीचे पारंपरिक स्वागत आणि नृत्य यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. पैशांनी केलेल्या मदतीपेक्षा ग्रामस्थांची व शाळा व्यवस्थापन समितीची मदत महत्वाची असल्याचे सांगितले. उपस्थित मुलांना प्रेरणा दिली व शाळेतील सुविधांचा वापर व सांभाळ करण्याचे वचन मागितले. शिक्षकांनी नाविन्यपूर्ण शिक्षणावर भर देण्यास सांगितले. भविष्यात शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. हेमुलजी बुनकर यांनी वाण्याविहीर केंद्र शाळेचीच या प्रॉजेक्टमध्ये निवड होण्यामागे शाळेतील शिक्षकांचे शाळेविषयी असणारे समर्पण पाहून केली असल्याचे नमूद केले. गट अध्यापन पध्दतीने मुलांचे अध्ययन कसे सुलभ होते हे सांगितले. या व अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बालाजी केंद्रे, विलास पवार, योगिता मांडवडे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, केंद्रातील शिक्षक यांनी मेहनत घेतली व वाण्याविहीर केंद्राचे केंद्र प्रमुख मोहन बिसनारीया यांनी मार्गदर्शन केले.