नंदुरबार | प्रतिनिधी
सेन्ट्रल किचनच्या माध्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना सकस व ताजे अन्न पुरवठा करण्याची केंद्र सरकारच्या नीती आयोगाची योजना आदिवासी भागासाठी लाभकारी ठरत असून, विद्यार्थ्यांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते आहे. ही योजना संपूर्ण भारतात राबविली जाईल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी नंदुरबार येथील सेन्ट्रल किचनच्या पाहणी दरम्यान सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मांडविया हे काल पासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर असून त्यांनी आज सेन्ट्रल किचनची पाहणी केली. निवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आश्रमशाळे पर्यंत पुरवठा करण्यात येणारे अन्नातील पोषक घटकांची प्रयोगशाळेत तपासणी करून सकस, ताजे अन्न पुरेश्या प्रमाणात वेळेवर पोहोचावे यासाठी सेन्ट्रल किचन करीत असलेल्या प्रयत्नांचे श्री मांडवीया यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रयोग शाळेसह संपूर्ण सेन्ट्रल किचनची पाहणी करून अन्न पुरवठ्याची यंत्रणा जाणून घेतली. तर तयार अन्नाची चवही घेतली.
नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेतील जवळपास दहा हजार पेक्षा अधिक मुलांना या सेंट्रल किचन शेड च्या माध्यमातून दोन वेळचे जेवण व सकाळ-संध्याकाळचा नाश्ता अशा आहाराचा पुरवठा केला जातो.
मंत्री डॉ.मांडवीया यांनी नंदुरबार शहरातील एकलव्य मॉडेल शासकीय आश्रम शाळेलाही (एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ) भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत मंत्रीमहोदयांनी संवाद साधला तसेच या ठिकाणी असलेल्या बौद्धिक कार्यशाळेच्या वर्गाला भेट देऊन कार्यशाळेत राबवण्यात येणार्या उपक्रमां बद्दल माहिती जाणून घेतली. कोरोना युद्धात केंद्र सरकारने यशस्वी विजय प्राप्त केल्याने येथील विद्यार्थींनींनी मंत्रीमहोदयांना योद्धाचे चित्र भेट दिले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख माडविया यांनी काल आणि आज नंदुरबार जिल्हा दौरा दरम्यान विविध विकास कामांची पाहणी करून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत पोहोचते याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनिषा खत्री,प्रकल्प अधिकारी मिनल करणवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जि.प.सदस्या सुप्रिया गावीत आदी उपस्थीत होते.








