नंदुरबार l प्रतिनिधी
बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सात भरारी पथक गठित करण्यात आली आहेत.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.
खरीप हंगाम जवळ येत असून येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व इतर कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हावीत म्हणून कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर 1 तर तालुकास्तरावर प्रत्येकी 1 प्रमाणे 6 अशी एकूण 7 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पथकात उप विभागीय कृषि अधिकारी, मोहिम अधिकारी, निरीक्षक वजनमापे हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षकाचा समावेश या पथकात असणार आहे.तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून काम पाहतील तर निरीक्षक वजनमापे, मंडळ कृषि अधिकारी,कृषि अधिकारी हे सदस्यन असतील.
बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या व्रिकी होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.