म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आणि कवयित्री पुष्पा पटेल या कवी दाम्पत्याची ९५ व्या साहित्य संमेलनात कविता वाचनासाठी स्तुत्य निवड झाली आहे.
जेष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली, ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हे संमेलन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर जि.लातुर येथे दि.२२ ते २४ एप्रिल २०२२ असे तीन दिवशीय साजरे होणार आहे.
या संमेलनात आयोजित कवी कट्टा मध्ये कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आणि कवयित्री पुष्पा पुरुषोत्तम पटेल या दोघांच्या कवितांची निवड करण्यात आली आहे.तसे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल यांनी यापूर्वीही औरंगाबाद येथे आयोजित ७७ व्या मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केली होती.प्रा.पटेल यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून सोशल मिडियावरुन मोठ्या प्रमाणात दोघांच्या कविता,लेख, चारोळी,भूलोळी प्रसिद्ध होत असतात. ते म्हसावद ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक कला-विज्ञान विद्यालयात उपप्राचार्य असून पुष्पा पटेल ह्या जीवन विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या ह्या निवडीबद्द्ल त्यांचे अभिनंदन होत आहे.