म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील ग्रामपुरोहित सुनील जोशी यांना श्री. हेरंब गणेश ट्रस्टच्या वतीने आदर्श ग्राम पुरोहित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील श्री हेरंब गणेश ट्रस्टच्या वतीने व ग्रामस्थांच्यावतीने आज नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवाच्या दिवशी ट्रस्टचे सदस्य शरद गोपाल पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदरही सुनील जोशी यांना 2010 साली नाशिक येथे शंकराचार्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. जोशी हे मागील 35 वर्षांपासून जयनगर तसेच पंचक्रोशीसह मध्यप्रदेश, गुजरात व संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम पुरोहिताचे काम करत आहेत. तसेच मागील 25 वर्षापासून भागवत कथेचे निरूपण व किर्तनकार म्हणूनही परिसरात प्रसिद्ध आहेत. 70 वर्षापूर्वी गावाचे माजी सरपंच कै. राजाराम मक्कन माळी यांनी गावात पुरोहितची आवश्यकता होती म्हणून सुनील जोशी यांच्या वडिलांना गावात पुरोहित म्हणून आणले होते. त्यांचा वारसा सध्या सुनील जोशी सांभाळत असून सामाजिक बांधिलकी म्हणून ते भागवत कथेचे निरूपण व किर्तन सादरीकरणाचे काम करत असतात, म्हणून ट्रस्टच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
गणपती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक रमण माळी यांनी केले, तर ट्रस्टचे सचिव दगडू पाटील, सदस्य झिपा पाटील, ईश्वर वारुळे, राजाराम पाटील, किशोर माळी, दिनेश माळी, सुपा माळी, बापू शुक्ल, किशोर पाटील गंगाराम नगराळे संतोष पारधी भावराव रोकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.