नंदूरबार l प्रतिनिधी
हवामान खात्याने तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील , निंभोरा,कोंढावळ, खापरखेडा, बोराळे, काकरदा येथे वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस झाला. त्यामुळे या गावांमधील काढणीवर आलेले केळी बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
साधारणता काल दि.7 मार्च रोजी 4:30 वाजेच्या सुमारास जयनगरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीटचा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी बागेसह, पपई, गहू, हरभराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपिटीच्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेले घडसहित केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे इतर रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे, त्यांचे गहू आडवे पडले आहे. खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळीसह गहू, हरभरा,पपई, कांदा, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी. अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.