म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी होवून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित कामांचे माहिती फलक लावण्यात यावे मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष महेंद्र कुंवर व पदाधिकारी यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र अरविंद कुवर, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष संतोष रतन पराडके व युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र भाईदास कुवर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री, वरिष्ठ अधिकारी व जिल्हा, तालुका प्रशासनास लेखी निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की. नंदुरबार जिल्हयातील आपल्या अखत्यारित्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामांची वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. उलट सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा येथील संबंधित अधिकारी बोगस कामे करणा-या ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. सा.बां. विभाग शहादा अंतर्गत येणारे एकुण सर्व रस्त्यावर गेल्या ४-५ वर्षात प्रत्येक रस्त्यांची कामे निकृष्ट, बोगस,व दर्जाहिन केल्यामुळे एकुण सर्वच रस्त्यांची दयनीय व अवस्था झालेली आहे. शासनाकडून रस्ते दुरुस्तीसाठी मोठा निधी दिला जात असतो. परंतु त्या निधीचा उपयोग चांगले व दर्जेदार रस्ते बनिण्यासाठी केला जात नसुन कामात पाप करणारे कामाचे ठेकेदार व संबंधित अधिकारी रस्त्याच्या कामात बोगसपणा करून शासनाच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. सदर निधी हा जणु काय रत्याच्या कामासाठी दिला नसुन ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना पोसण्यासाठी दिला जात आहे. सा. बां. विभाग शहादा अंतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या रस्त्यांचे नित्कृष्ट काम बघुन असेच वाटत आहे.दि. ११/१/२०२२ रोजी शहादा तालुक्यातील चिखली खुर्द ते दिगर या रत्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट व तकलादु कामाविषयी कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग शहादा यांच्याकडे पुराव्यासकट लेखी तक्रार दिल्यावरही तक्रारीची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यवाही करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हतबल होवून दिनांक ३/२/२०२२ रोजी अधिक्षक अभियंता सा.बां. बांधकाम मंडळ धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली गेली. परंतु अद्याप पावेतो त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा नित्कृष्ट कामाला भेट देण्यात आलेली नाही. आजच्या स्थितीला निकृष्ट कामे झालेली आहेत. जुना रस्ता न खोदता वरून अत्यल्प व कमी प्रमाणात डांबर वापरून निकृष्ट डमी खडीचा वापर करून अत्यंत कमी थराचा रस्ता तयार केल्यामुळे आजच रस्त्यांची दयनीय सुरुवात झालेली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय होण्यास सुरूवात झालेली आहे.आपण सदर रस्त्याला भेट दिली तर आपल्यालाही सामना करावा लागेल. दि. ११/१/२०२२ रोजी आमोदा ते मडकाणी रस्त्याची तक्रार केली गेली. त्याचीही अद्याप पावती दखल घेतली गेली नाही. सा.बां. विभाग शहादा अंतर्गत एकूण सर्व रस्त्यांची कामे निकृष्टपणे केलेली आहेत व केली जात आहेत. एकूण सर्वच रस्त्याच्या कामाची योग्य ती चौकशी होऊन बोगस,निकृष्ट व दर्जाहिन काम करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य,दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच बोगस काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अंदाजपत्रकानुसार काम न करता निकृष्ट,दर्जाहीन व बोगस काम ज्या रस्त्यांची झालेली आहेत,त्या रत्यांची कामे करणा-या ठेकेदारांकडून अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे नुतनीकरण करून घेण्यात यावे. निकृष्ट,दर्जाहीन,बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांस पाठीशी घालणाऱ्या अधिका-यांवरही तात्काळ कायद्यात नमूद असलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच बोगस काम करणाऱ्या ठेकेदार जुमानत नसतील आणि रत्याचे काम निकृष्ट,दर्जाहीन करत असतील तर त्यांच्यावर वेळ प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात यावेत.तसेच अंत्यत महत्वाचा विषय असा की, सा.बां. विभाग शहादा मार्फत झालेल्या व सुरू असलेल्या एकही कामावर गेल्या ५ वर्षापासुन माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब असुन सुरू व झालेल्या कामांची माहिती विषयी कोणाला थांगपत्ता लागु नये यासाठी प्रत्येक कामावर माहिती फलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यांचे कामाचे नांव, कामांची अंदाजीत रक्कम, काम सुरू करण्याचा दिनांक, काम पुर्ण करण्याचा कालावधी कामाची लांबी-रुंदी, संबंधित देखरेख अधिका-यांचे नाव व पत्ता, मक्तेदाराचे नांव व पत्ता यांची माहिती सामान्य जनतेला माहिती फलक नसल्यामुळे माहित पडत नाही. कितीही निकृष्ट काम केले अत्यल्प व कमी प्रमाणात डांबर वापरले गेले, बोगस खडी वापरली गेली, अंदाजपत्रकानुसार काम केले नाही तरीही कुणीही काहीही करू शकणार नाही कारण की रत्याच्या कामाविषयी काही माहिती मिळत नाही. यासाठीच ठेकेदार व अधिकारी माहिती फलक लावत नाही.कायद्याने प्रत्येक कामावर फलक लावणे बंधनकारक असतांनाही माहिती फलक न लावणे ही गंभीर बाब आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा ९०टक्के आदिवासी समाज असलेल्या गाव परिसरात येतो. तरीही आदिवासी समाजाला विकासाचा लाभ मिळू नये साठीच माहिती फलक लावले जात नाही.तरी गेली ५ वर्षापासून ते आजपर्यंत सुरु असलेल्या प्रत्येक कामावर तात्काळ माहिती फलक लावण्यात यावे.अन्यथा दिनांक १४/०२/ २०२२ पावतो वरिल दोन्ही तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग शहादा यांच्या कार्यालयास समोर आम्ही स्वतः व परिसरातील कार्यकर्त दिनांक १४/०३/ २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेपासुन आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत. आंदोलना दरम्यान उदभवणा-या परिस्थितीस आपण व संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील याची दक्षता घ्यावी.असेही निवेदनात म्हटले आहे.








