नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. अशा जिल्हयांची प्रशासकीय गटात विगतवारी करण्यात येवून त्यांना काही निर्बंधातून 100 टक्के मुभा देण्यात आली आहे . त्यात नंदुरबार जिल्हयांचा समावेश करण्यात आलेला नाही . परंतु , जिल्हयाला काही निर्बंधातून 50 टक्के मुभा देण्यात आली आहे . दि. 4 मार्च , 2022 चे मध्यरात्री जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनीषा खत्री यांनी नियमावली जाहीर केली आहे.
* आस्थापनांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सेवा पुरवतात त्यांचे पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे .
*कोणत्याही सार्वजनिक, खाजगी वाहतूक वापरकर्त्यांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे .
* मॉल्स , थिएटर , नाट्यगृह , पर्यटन स्थळे , रेस्टॉरंट्स , क्रीडा कार्यक्रम आणि धार्मिक स्थळे येथील सर्व कर्मचारी तसेच सर्व अभ्यागतांना पूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे .
* सार्वजनिक किंवा खाजगी कोणत्याही कार्यालयात किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे .
*सामाजिक / क्रिडा / मनोरंजन / शैक्षणिक / धार्मिक / सांस्कृतिक / राजकिय / सण – उत्स्व संबंधित कार्यक्रम / विवाह सोहळा आणि अंत्यविधी तसेच इतर कार्यक्रमासाठी एकूण उपस्थिती ठिकाणाच्या क्षमतेच्या 50 टक्के किंवा 200 यापैकी जी कमी असेल तितकी मर्यादित असेल .
* सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स , चित्रपटगृहे / सिनेमा हॉल ( मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह ) , नाटयगृहे , हॉटेल आणि बार , क्रिडासंकूल , जिम्स / व्यायाम शाळा , स्पा , जलतरण तलाव , धार्मिक स्थळे , पर्यटन स्थळे , मनोरंजन पार्क अशी सर्व स्थळे आस्थापना ही ठिकाणाच्या क्षमतेच्या 50 टक्क्याने ने सुरू राहतील.
*आंतर – राज्य आणि राज्यांर्गत प्रवास
पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी आंतर – राज्य आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतेही निर्बंध नाहीत . पूर्णपणे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी , आंतर राज्य हालचाली 72 तासांसाठी वैध RT – PCR चाचणीच्या आधारावर प्रवास करता येईल . अशा प्रवासासाठी कोणत्याही प्रवास नाहरकत दाखल्याची गरज भासणार नाही .
केंद्र / राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश , सूचना , अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना सक्तीचे असेल असे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.