नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे नंदुरबार शहरातील जनता आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांची,व्यापाऱ्यांची आर्थिक घडी सुरळीत न झाल्याने नागरिकांकडून घरपट्टी वसूल न करता ती पूर्णतःमाफ करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,ज्यांचा नगरपालिकेच्या प्रशासनाशी,कारभाराशी काडीमात्र संबंध नसताना व जे व्यक्ती पालिकेचे कुठलेही पदाधिकारी नसतांना नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन घरपट्टीचे आदेश कसे देऊ शकतात ? मुळातच तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात हे अनधिकृत,घटनाबाह्य नियमबाह्य बैठकीला उपस्थित राहून या चंद्रकांत रघुवंशी यांच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करू शकतात?असा सवाल करून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे की,”खबरदार सक्तीची वसुली कराल तर, तोंडावर पडाल !”
एकीकडे नंदुरबार शहरात नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे.असे असतांना सक्तीची वसुली कशी करू शकतात?शहरात सर्वत्र भूमिगत गटारींची वाट लागली,सगळीकडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली,ठिकाणी केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले, मोकाट गुरांचा सुळसुळाट आहे, साफसफाई व स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खोटी बिले काढली जात आहे, भूमिगत गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी माजली आहे व त्यामुळे डास व मच्छरांचा उपद्रव वाढला आहे.नंदुरबार शहरात ठिकठिकाणी कॉलन्यांमध्ये बाग- बगीच्यांसाठी करोडो रुपये लावले व खर्चही केले,मात्र ते बाग-बगीचे कुठे आहेत?असे एक नव्हे अनेक मुद्दयांचा ढिग असताना कुठल्या तोंडाने तुम्ही घरपट्टी वसूल करणार आहात ? “हिम्मत असेल तर नळ कनेक्शन तोडून दाखवा जनता जनार्दन तुम्हाला तुमची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे. प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की,चंद्रकांत रघुवंशी हे नगरपालिकेच्या कुठल्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी बैठक घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी,अशी मागणी देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.








