नंदुरबार l प्रतिनिधी
प्रेमातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावित्रीबाई चौरे यांनी आपला संघर्ष सुरू केला वर्ष भर विविध ठिकाणी अर्ज, निवेदन देऊन ती न्यायासाठी लढा देत होती. अखेर 1 लाख 30 हजार रुपये आणि दोन वाहणे मिळविण्यात सावित्रीबाई यांना यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणी त्यांचा विषय समोर आला होता. महिला समुपदेशन केंद्र नंदुरबार आणि पोलिस विभागाची मदतीने त्यांना दिलासा मिळाला. वाघाळे ता. नंदुरबार येथील महिलेचा श्रीरामपूर ता. नंदुरबार येथील विवाहित तरुणाशी प्रवासात ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून सावित्रीबाई यांच्याकडून पैसे घेतले. त्यांचे एटीएम सुद्धा वापरत होता. अचानक दोन्हींमध्ये वाद झाला. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही असे सांगून सावित्रीबाई यांच्याशी संपर्क टाळला. तोपर्यंत तरुणाने लाखो रुपये खर्च केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावित्रीबाई यांनी पोलिस विभाग, महिला समुपदेशन केंद्र नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल केली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा उपस्थिती पार पडलेल्या नंदुरबार येथील जनसुनावणीत आपली बाजू मांडली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार ग्रामीण पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी आपल्या टीम सोबत सावित्रीबाई यांची फसवणूक करणार्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवताच संबंधित तरुणाने सावित्रीबाई यांचे 1 लाख 30 हजार रुपये आणि दोन दुचाकी परत केल्या आहेत. यावेळी महिला समुपदेशन केंद्रातील जिल्हा समुपदेशक राहुल जगताप आणि अकुली पावरा यांनी सावित्रीबाई यांचे समुपदेशन केले. सावित्रीबाई यांना मिळालेल्या रक्कमेची त्यांच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट करण्यात आले. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष अँड.सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा मार्गदर्शनाखाली समुपदेशन केंद्राचे काम सुरू आहे.