नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे गटारीवर घराचे बांधकाम केल्यानेच घराजवळ गटारीचे पाणी साचते, असा समज करून सहा जणांनी तिघांना मारहाण करीत चाकूने वार केल्याची घटना घडली. याच घटनेत पहिल्या फिर्यादीनुसार चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या गटाने फिर्याद दिल्याने गैर कायद्याची मंडळी जमा करण्यासंदर्भात नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथे गावठाणच्या जागेवरील रस्त्यावर घर बांधकाम केल्याच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात चार जणांविरुद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या गटाने फिर्याद दिली आहे. याबाबत राजेंद्र भालचंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भालचंद्र राठोड यांनी गावठाण जागेच्या गटारीवर घराचे बांधकाम केल्याने गटारी अडविली गेली, त्यातील पाणी आपल्या घराजवळ येते म्हणून संदीप सुभाष कुमावत व इतर नेहमीच वाद घालत असे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री देखील त्यांनी वाद घातला. जोरजोराने शिवीगाळ केली. भालचंद्र राठोड हे त्यास समजविण्यासाठी गेले असता बन्सीलाल राठोड यांनी कॉलर पकडून गटारीत ढकलून दिले. राजेंद्र व त्यांचा भाऊ हे वडिलांना सोडविण्यासाठी गेले. परंतु तेथे कुमावत यांच्याकडील इतरही काही जण तेथे आले असता त्यांनी पकडून ठेवले तर संदीप कुमावत याने खिशातील चाकूने राजेंद्र राठोड यांच्यावर वार केला. त्यात त्यांच्या कमरेला दुखापत झाली. याप्रकरणी राजेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून संदीप सुभाष कुमावत, कपिल सुभाष कुमावत, बन्सीलाल कुमावत, राकेश बन्सीलाल कुमावत, गणेश बन्सीलाल कुमावत, विजय कुमावत सर्व रा. चौपाळे, ता. नंदुरबार यांच्याविरुद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास हवालदार नरेश गुरव करीत आहेत.