नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सावऱ्यादिगर येथील सुना फुगदा पावरा ही ५५ वर्षीय महिला दळण वळणासाठी बिलगाव येथे नदी मधुन जात असतांना तिचा तोल गेला त्यात तिचे दळण ही पाण्यात पडले अश्याच प्रकारे सावऱ्या दिगर व त्या परिसरातील स्रियांना, मुलींना, पुरुषांना दळण वळणासाठी चिखलाची वाट तुडवत बिलगावला जावे लागत असते. त्यामुळे सुस्त प्रशासन आमच्या १७ वर्षापासून रखडलेला पुलाचा प्रश्न कधी पूर्ण करेल असा संतप्त सवाल उपस्थित करून त्यासाठी नूतन महिला जिल्हाधिकारी यांनी तरी हा प्रश्न मार्गी लावावा अशी रास्त मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सावऱ्यादिगर येथील सुना फुगदा पावरा ही ५५ वर्षीय महिला आपल्या गावाहून डोक्यावर जवळपास २५ ते ३० किलो धान्य बिलगाव येथे दळण दळणासाठी जात होती परंतु रस्त्या अभावी ती गावाजवळील नदीमधून चिखल तुडवत जात असतांना चिखलात तिचा तोल गेला व डोक्यावरील ओझे पाण्यात पडले त्यामुळे तिचे धान्य ही भिजले. रस्त्यासाठी त्यांना सातत्याने द्राविडी प्राणायम करावा लागत असतो. गेल्या १७ वर्षांपासून रखडलेला पुलाचा प्रश्न का मार्गी लावण्यात येत नाही असा संतप्त सवाल तेथील आदिवासींनी उपस्थित केला आहे. कारण तिच्या सारख्या अनेक स्रियांना, मुलींना, पुरुषांना दळण वळणासाठी अश्याच प्रकारे नदी मधून चिखल तुडवत बिलगावला जावे लागत असते. यांच्यावर ही परिस्थिती सुस्त सरदार सरोवर प्रशासनामुळे आली आहे. असा आरोपही या नागरिकांनी केला असून या गावातील काही पाडे ही सरदार सरोवरमुळे बुडितात गेली. शासनाने त्यांचे पुनर्वसन केले परंतु इतर पाडे बुडितात जात नाही . पाण्यामुळे टापू होतात.सहाजिकच आमचेही पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने त्यांचे पुनर्वसन नाकारले. २००५ ला भिंगारे समिती स्थापन करण्यात आली होती. यातील तज्ज्ञांनी पाहणी करून गावाचे पुनर्वसन न करता दळण वळणसाठी रस्ता व पूल बांधून दिला तर प्रश्न सुटेल. परंतु अजूनही नदीवर बांधण्यात आलेला पूल पूर्णतः मार्गी लावण्यात आलेला नाही. आतापर्यंतच्या प्रशासनाने पूल मार्गी लावलेला नाही. सावऱ्या दिगर सह ,भमाना, वरवाली,सादरी ,भाबरी उडद्या, भादल या गावांची देखील हीच वाट. सरदार सरोवर चे पाणी भरल्यामुळे या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. एखादी अडलेली डिलिव्हरी असो की,सर्पदंश असो जीवन जगणे एकदम कठीण आहे. दोनवर्षांपूर्वी याच गावातील ७वीत शिकणारी मुलगी संगीता वादऱ्या पावरा ही चिमुकली तिच्या लहान बहिणीसह लाकडाच्या छोट्या डुंगी वर बसून दुकानात सामान घेण्यासाठी जात असताना डुंगी पालटली व संगीताचा बुडुन मृत्यू झाला. तेंव्हा सुद्धा नर्मदा विकास विभागाने जी बोट येण्याजाण्यासाठी ठेवली होती ती बंद होती व आतादेखील एक वर्षांपासून बंद आहे. प्रत्येकवेळी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत तेथील आदिवासी सावऱ्यादिगर च्या पुला बाबत प्रश्न उठवित असतात तेवढ्या पुरते प्रशासन खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेत असतात. आदिवासींची रस्त्याची ही बिकट वाट कधी पूर्ण होईल असा संतप्त सवाल आदिवासींनी उपस्थित करून निदान पावसाळ्यापूर्वी तरी नूतन जिल्हा प्रशासनाने मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न करावे. अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.