नंदूरबार l प्रतिनिधी
नदुरबार राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात , अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे . याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले असून सदरचे निवेदन राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे . निवेदनाची दखल घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे .
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्याकरिता अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या २ वर्षापासुन ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याकरीता आयोग गठीत केला परंतु आयोगाला कोणतेही अधिकार सुपूर्त केले नाहीत . आयोगाला आवश्यक ४५० कोटींच्या निधीची तरतूद केली नाही त्यामुळे एम्पेरिकल डाटा गोळा करण्याकरिता आयोगाला एजेंसी नियुक्त करता आली नाही परिणामी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित एम्पेरिकल डेटागोळा करन्याकरिता राज्य सरकार कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे . आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेऊ नये , सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात , अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारेल , असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे . जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्यासह लियाकत बागवान , लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते .








