नाशिक l प्रतिनिधी

प्रधान धोरणी आणि चाणाक्ष असेल,सेनापती धाडसी आणि चौकस असेल तर सैन्य कुठलीही खिंड लढवून विजयश्री खेचून आणते,या छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचा आदर्श नजरेसमोर ठेवून नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलाची वाटचाल सुरू असल्याने नाशिक,अहमदनगर,जळगाव, धुळे,नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधीत आहे.कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवतांना दुर्दैवाने दाखल गुन्ह्यांची उकल करण्यातही परिक्षेत्राच्या पोलीस दलाने विशेष कौशल्य सिध्द केले आहे. या कौशल्याला बळ मिळाले ते अर्थातच परिक्षेत्राचे प्रधान पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील,तर सेनापती नंदूरबारचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील,नाशिकचे पो.अधिक्षक सचिन पाटील,अहमदनगरचे मनोज पाटील,जळगावचे प्रविण मुंडे,धुळ्याचे प्रविण पाटील ,यांच्या अभ्यासु आणि अनुभवी मार्गदर्शनाचे.

अशाच कौशल्याचा सन्मान करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी गेल्या दोन दिवसात उकल झालेल्या क्लिष्ट प्रकरणाच्या तपासाबद्दल वणी आणि नंदूरबार पोलीसांच्या कर्तृत्वावर शाबासकीची थाप दिली.ही थाप केवळ या वणी आणि नंदूरबार पोलीसांच्या कौतूकासाठी नाही तर एकूणच परिक्षेत्रातील पोलीसींगच्या कर्तृत्वाचा प्रातिनिधीक सन्मान असल्याच्या भावना यावेळी व्यक्त झाल्या.
बुधवार दि.२७ आॕक्टोबरच्या रात्री साधारण ११.३०-१२.००वा.दरम्यान वणी बस स्टॕण्ड परिसरात एका महिलेवर सामुहिक बलात्काराचा दुर्दैवी प्रकार घडला होता.ही बाब निदर्शनास येताच वणी पो.ठाण्याचे प्रभारी सहा.पो.निरिक्षक स्वप्निल राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रणनिती तयार करून संशयीतांचा माग काढला.अवघ्या तीन तासात या विकृत संशयीतांच्या मुसक्या बांधण्यात राजपूत आणि कंपनीला यश आले.या गुन्ह्याची वार्ता कळताच उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर आणि पो.अधिक्षक सचिन पाटील यांनी सातत्याने वणी पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून संशयीतांचा छडा लावण्यास मार्गदर्शन केले.पोलीस अधिक्षकांनी तर पहाटेपासूनच पोलीस ठाण्यात तळ ठोकला होता.

नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पो.नि.रविंद्र कळमकर यांनीही एका खुनाच्या गुन्ह्यात आपले कौशल्य पणाला लावून अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला गुन्हा उघडकीस आणून संशयीतांच्या नाड्या आवळल्या.पो.अधिक्षक प्रद्यूम्न पाटील यांनी केलेल्या मार्गदार्शनामुळे या गुन्ह्याची उकल झाल्याचे कळमकर सांगतात.सहा.पो.नि.स्वप्नील राजपूत यांच्या पथकातील पो.उपनिरिक्षक रतन पगार,पो,हवा.एच.के.चव्हाण,पो.ना.सी.एम.बागूल ,ए.एम.जाधव,व्ही.डी,बच्छाव,काॕन्स्टेबल एस.जे,ठाकरे,व्ही.एस.खांडवी तर नंदूरबार एलासीबीचे पो.नि.रविंद्र कळमकर यांच्या पथकातील ठाणे अंमलदार अनिल गोसावी,पो.हवा.महेंद्र नगराळे,पो,ना.मोहन ढमढेरे,किरण मोरे ,पो.काॕ.अभय राजपूत,यशोदीप ओगळे यांना नाशिक परिक्षेत्र मुख्यालयात बोलावून उपमहानिरिक्षक शेखर पाटील यांनी त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली.या छोटेखानी सत्कार सोहळ्यासाठी पाचही जिल्ह्याचे पो.अधिक्षक,अतिरिक्त पोलीस अधिक्षक तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी आवर्जून उपस्थित होते.उप महानिरिक्षकांनी परिक्षेत्राचा प्रभार घेतल्यापासून पाचही जिल्ह्यात अवैध धंदे आणि माफियागीरी,गावगुंडीविरूध्द विशेष मोहीम सुरू केली आहे,त्याचा सकारात्मक परिणाम नाशिक विभागात जाणवू लागला असून विशेष पथकांचा धाक जमू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे या सत्कार सोहाळ्यामुळे परिक्षेत्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेला नवी उर्जा मिळणार असल्याने आगामी काळात मपोसेच्या इतिहासात नाशिकचे पान सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल.









