नंदुरबार l प्रतिनिधी-
“तरुणांच्या हाताला काम आणि जीवनाला नवी दिशा” या उदात्त ध्येयाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. सौ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून तब्बल दोन हजार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आला.
डिजिटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, श्रीमती क.पू.पाटील माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यात अदानी ग्रुपच्या सोलर प्रकल्पासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी आयुक्त सी. पी. चौधरी, भारती गिरासे , संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, एक्सलन्सी डिजिटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता विजय बोरसे, खोंडामळी गटाचे जि. प. सदस्य शांताराम पाटील, कि. वि. प्रसारक संस्था शिरपूरचे प्रशासकीय अधिकारी के. डी. बच्छाव , अडाणी उद्योग समूहाचे प्रतिनिधी आकाश भावसार व केतल भावसार यांच्यासह विठोबा माळी, रवींद्र बागुल , रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित राहिले होते. यावेळी मान्यवरांनी रोजगाराच्या बदलत्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व, औद्योगिक क्षेत्रातील अपेक्षा आणि युवकांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. “कौशल्य, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या बळावर यश निश्चित मिळते,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या आशा निर्माण झाल्या असून, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने उभारलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

या मेळाव्यात 329 युवकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात अडाणी सोलर ग्रुप-८५, आकाश ऑटोमोबाईल-०३, नवनाथ फर्टीलायझर-५ असे एकूण ९३ युवकाची सिलेक्शन झाले आहे. 27 मे पर्यंत नोंदणी झालेल्यांची सिलेक्शन प्रक्रिया सुरू राहील. यापुढेही येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
विजय बोरसे, कार्याध्यक्ष का.वी.प्र. संस्था ,भालेर.








