जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नर्मदा काठच्या अतिदुर्गम गावांना भेट
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याच्या नर्मदा काठी वसलेल्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रा.आ. केंद्र रोषमाळ खु अंतर्गत येणाऱ्या चिचखेडी, सिक्का व भरड या गावांना भेट दिली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सोबत दिग्विजयसिंह यांनीही पायपीट करून आणि नर्मदा नदीवरील बोट अब्युलन्सचा वापर करून रात्री उशिरापर्यंत गावांची पाहणी केली.
ग्रामस्थांशी थेट संवाद:
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, रोजगार, जॉब कार्ड (मनरेगा), बांधकाम, घरकुल तसेच स्थलांतरित कामगार या विषयांवर चर्चा केली. उपस्थितांच्या अडचणी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
अधिकारी व स्थानिकांचा सहभाग:
या भेटीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, वैद्यकीय अधिकारी हिमांशू चव्हाण, डॉ. शिवाजी पवार, बोट अॅम्ब्युलन्सवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पावरा यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पावरा, आरोग्य सहाय्यक राकेश पावरा, प्रा. बाबुलाल पावरा (रोषमाळ खु), आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग होता.
या दौऱ्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून शासन यंत्रणा थेट गावपातळीवर पोहोचून त्यांच्या समस्या ऐकून घेते आणि तातडीने मार्गदर्शन करते, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.