नंदुरबार l प्रतिनिधी-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 10 मे 2024 रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेण्याची ही तिसरी वेळ असेल.
महायुतीच्या उमेदवार महासंसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या कारकिर्दीला अशी अनेक प्रकारची खास वैशिष्ट्ये लाभली आहेत़. 2014 यावर्षी समाजकार्यात मग्न असलेल्या युवा नेत्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे अशा बड्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केली होती.
त्यावेळी त्यांचे वैद्यकीय उच्च शिक्षण चालू होते आणि एमबीबीएस ची परीक्षा देत होते. अशातच त्यांनी त्यांचे वडील मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेचे उमेदवारी दाखल केली होती. त्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे 2014 या वर्षी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी नंदुरबार येथे येऊन पहिली भव्य प्रचार सभा घेतली होती. एक लाख लोक उपस्थित असल्याचा दावा त्यावेळी भाजपाकडून करण्यात आला होता आणि ती रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती मानली गेली होती.
त्या पहिल्या निवडणुकीतच प्रचंड बहुमताने डॉक्टर हिनाताई गावित निवडून आल्या. नंदुरबार लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. त्याचबरोबर संपूर्ण खानदेशातून संसदेत पोहोचलेली पहिली आदिवासी महिला खासदार म्हणून देखील त्यांचाच उल्लेख केला जातो.
निवडून आल्याच्या त्या पहिल्या पाच वर्षात डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या नेतृत्वाची विशेष छाप पाडली. भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यात संघटन वाढवण्या सोबतच आदिवासी भागाचे प्रश्न संसदेत मांडण्याचा विक्रम नोंदवला. आदिवासी भागातील समस्यांवर आणि इतर मुद्द्यांवर अभ्यासूपणे संसदेत बोलणाऱ्या या भागातील त्या पहिल्या खासदार ठरल्या. 2019 यावर्षी दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्याच वतीने उमेदवारी केली. दमदार विकास कामांच्या बळावर दुसऱ्यांदा भाजपाने त्यांना संधी दिली.
त्या निवडणुकीत सुद्धा डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराला आले होते. नंदुरबार येथील धुळे रस्त्यावरील चौपाळे शिवारातच त्यांची भव्य सभा पार पडली होती. या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांचा पराभव करून दणदणीत विजय प्राप्त केला होता. खासदारकीच्या या दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा डॉक्टर हिना गावित यांनी विक्रमी विकास कामे करून दाखवली. दोन लाखाहून अधिक गृहिणींना गॅस, पावणेदोन लाख बेघरांना घरे दिली, राष्ट्रीय महामार्गासह गावागावातील काँक्रिटीकरण करून दळणवळणाचा विकास केला.
त्या तसल्या विकास कामांच्या बळावर त्यांनी आता तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केली असून विकास कामांवर आधारित त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यांच्या विकास कामांची दखल घेऊन त्यांना महासंसद रत्न हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. सलग सात वेळा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या खानदेशातील त्या पहिल्या महिला खासदार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणारे भाषण संसदेत करण्याची संधी मिळालेल्या त्या पहिल्या युवा खासदार आहेत.
जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय महिला सुरक्षा सारख्या देशपातळीवरील समित्यांमध्ये अध्यक्षपदी राहिलेल्या व विदेशात जास्तीत जास्त अभ्यास दौरे करणाऱ्या पहिल्या महिला खासदार म्हणून सुद्धा संपूर्ण खानदेश त्यांच्याकडे पाहतो.
काही दिवसापूर्वी नंदुरबार येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा होऊन गेली. त्या सभेत त्यांनी मोदी सरकारच्या राज्यात आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर धनगर आणि मराठा यांचे आरक्षण 70 टक्के पर्यंत नेण्यासाठी आवश्यक ते बदल करू असे राहुल गांधी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या सर्व गोष्टींचा समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शब्दात घेतील आणि आदिवासी बांधवांसाठी कोणती घोषणा करणार,
या संदर्भाने उद्या दिनांक 10 मे रोजी होणाऱ्या सभेविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांच्याही प्रचार सभा चालू असून भाजपा आदिवासींचे आरक्षण हटवणार आणि संविधानात बदल करणार, असा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. तथापि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर हिना गावित यांनी त्या आरोपांना आपल्या भाषणातून तीव्र शब्दात उत्तर देणे सुरू ठेवले आहे. भाजपा सरकार आदिवासींचे आरक्षण काढणार असल्याचा काँग्रेसचा आरोप खरा ठरला तर मी राजकीय संन्यास घेईल परंतु मोदी सरकारने तसला कोणताही निर्णय घेतला नाही तर काँग्रेस नेते के सी पाडवी राजकीय संन्यास घेतील का? ते माझे आव्हान स्वीकारतील का? असे जाहीर आव्हान डॉक्टर हिना गावित यांनी नुकतेच दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा लक्षवेधी ठरणार आहे.