शहादा l प्रतिनिधी

जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम व त्यागासोबत संस्कार आवश्यक असतात. कृषी शिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान व अनुभव आयुष्यभर उपयोगी ठरत असल्याचे प्रतिपादन युनियन बँकेचे शाखाधिकारी मयूर पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील होते.

यावेळी कृषी महाविद्यालय पुण्याचे क्रीडा अधिकारी डॉ.अभिजीत नलावडे, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, डॉ. एन.जे. पाटील, डॉ.एस. पी.पवार, प्राचार्य रवींद्र एस. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.मयूर पाटील पुढे म्हणाले, आयुष्यात माणसाने माणूस म्हणून कसे जगावे हे कृषी शिक्षणातून कळते. कृषी शिक्षण परिपूर्ण माणूस घडविण्याचे कार्य करत असून माता आणि मातीचे कृषी शिक्षणाशी घट्ट नाते आहे.स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी तोंड व कान बंद ठेवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले, मनातून पराभूत झाल्यावरच व्यक्तीची हार होते. मन खंबीर ठेवल्यास आपण जिंकणारच हा आत्मविश्वास असतो.
डॉ. पी. एल. पटेल म्हणाले, खेळात कोणीतरी पराभूत होत असतो म्हणूनच कुणीतरी जिंकतो.पराभवाने खचून जाऊ नये. खेळ असो वा जीवन जगणे यांत मूल्यांची जपणूक केली तर यश प्राप्त होत असते.प्रा. डॉ. नलावडे यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातून मुले व मुली मिळून सुमारे साडेचारशे विद्यार्थी व पन्नास प्राध्यापक सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न होत आहेत.दरम्यान,आज ऑगस्ट रोजी स्पर्धेचा समारोप प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी दिनेश गिरासे याने केले. शपथ ग्रहण विद्यार्थी मयूर पाटील या विद्यार्थ्यांनी दिली. आभार विद्यार्थी कल्याण विकास अधिकारी प्रा. डॉ.भरत चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.









