नंदुरबार l प्रतिनिधी

शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी तसेच सर्व शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा!’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, या मागण्यांचा समावेश असलेले निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने हे निवेदन उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना ठुगे यांनी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्हा शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्यावतीने सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर बी पाटील व वरिष्ठ सहाय्यक विशाल रामचंद्र धोडरे आणि खंडू वामन भालकर वरिष्ठ सहाय्यक यांनी निवेदन स्वीकारले
त्याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे . सतीश बागुल, जितेंद्र मराठे, हर्षल देसाई, मयूर चौधरी हे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने शासनाला ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये सामाजिक संस्थांना सामावून घ्यावे, असे आदेश दिले आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी जनजागृती करणे अभिप्रेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या 20 वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते.
या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनीचित्रफित दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, ‘सोशल मीडीया’ द्वारे जनजागृती मोहीम राबवणे आदी कृती केल्या जातात. या संदर्भानेच आमच्या वरील मागण्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत आढळतात. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.103/2011) दाखल केली होती. तिची सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले.
त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. ‘प्लास्टिक बंदी’ नुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायद्याने गुन्हा आहे. सध्या तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून येते. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे, असे देखील निवेदनात म्हटले आहे









