नंदुरबार l प्रतिनिधी

शेती कसण्याच्या वादातून दोन कुटूंबांमध्ये वाद होऊन गावठी बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मलगाव ता.शहादा येथे गुरुवारी घडली.यावेळी तलवारीचा ही वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील मलगाव गावाजवळ पिपलीपाडा येथे दोन कुटुंबामध्ये शेती कसण्याचा वाद आहे. या वादातूनच गुरुवारी दुपारनंतर गावठी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. गोळी लागून अविनाश खर्डे (३०) याचा जागीच मृत्यू झाला तर सुखराम खर्डे (40) जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याठिकाणी झालेल्या वादात बंदुकीसह तलवारीचा देखील वापर करण्यात आला. यात रायसिंग खर्डे, गणेश खर्डे आणि सुनील पावरा हे तीन जण जखमी असून एक जण गंभीर जखमी असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.









