नंदूरबार l प्रतिनिधी
बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरूवात नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून बालविवाहामुळे बालकांच्या विशेषतः मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समूळ उच्चाटन झाले तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या या देखील कमी होण्यास मदत होईल. या निरामय भावनेने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी “ऑपरेशन अक्षता” यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवून बाल विवाह रोखण्याची जबाबदारी पार पाडावी तसेच महिलांसंबंधी घडणाऱ्या कौटुंबीक हिंसाचाराच्या व अन्य अत्याचाराच्या घटनांविषयी सजगता निर्माण व्हावी यासाठी शेवटच्या समाज घटकापर्यंत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात गाव पातळीवर काम करणारे महत्वाचे घटक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचादेखील सहभाग या उपक्रमात करून घेण्यात आला आहे. समाज घटकातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखून गावात विवाह प्रतिबंधाबद्दल जनजागृती करुन या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
तसेच पालकांनी अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा यांचा बालविवाह न करता त्यांना उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांवर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे.
या दोन्ही उपक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन आहे की, बालविवाह व अंमली पदार्थांसंदर्भात काही माहिती असल्यास तात्काळ आपले मोबाईल फोनवरून 9022455414 अथवा टोल फ्री क्रमांक 112 या क्रमांकावर द्यावी. सदरचे क्रमांक हे 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.