नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीपूर्वी चुरशीची वाटणारी निकालाअंती एकतर्फी झाल्याचे दिसून आले. बाजार समितीवर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा करिष्मा कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वात १७ जागांवर शेतकरी विकास पॅनल तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.यामुळे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत दोन उमेदवार विजयी झाले होते.यंदा मात्र भाजपाचा मात्र सुपडा साफ झाल्याचे चित्र या निवडणूकीत दिसून आले.
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३७ उमेदवारांनी आपले भवितव्य आजमाविले होते. १६ मतदान केंद्रांवर एकूण २ हजार ६६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९७.८७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. डॉ.विजयकुमार गावित पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल यात सरळ लढत होती. दरम्यान काल सकाळी नंदुरबार येथील आयटीआय हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी असल्याने सकाळपासूनच उमेदवारांसह समर्थक मतमोजणीस्थळी दाखल झाले होते.
एकूण १० टेबलांवर निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रत्ना मोरे, निरीक्षक भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीचे नियोजन करण्यात आले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला हमाल मापाडी मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अपक्ष उमेदवार अशोक आरडे यांना १०९ मते प्राप्त झाल्याने ते विजयी झाले. तर यानंतर व्यापारी व आडत्यांचा मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला. यात गिरीष मदनलाल जैन व प्रकाश अवचित माळी हे दोन्ही शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर अखेरपर्यंत शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व कायम राहिले. मतमोजणीप्रसंगी पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी तीनदा पुर्नमतमोजणीसाठी अर्ज केले होते. यामुळे वारंवार पुर्नमतमोजणी होत असल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत दोन उमेदवार विजयी झाले होते.यंदा मात्र भाजपाचा मात्र सुपडा साफ झाल्याचे चित्र या निवडणूकीत दिसून आले. अखेरचा निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी व शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.
विजयानंतर आमदार कार्यालयात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डॉ. गाविताना मोठा धक्का
नंदूरबार बाजार समितीच्या मतमोजणीत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला असून त्याने बंधू प्रकाश गावित यांना पराभवाचा सामना करावा लागला तर शिंदे गटातून नुकतेच भाजपात परतलेले रविंद्र गिरासे व डॉ.विक्रांत मोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
रघुवंशी गटाने राखला गड
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९४८ साली झाली तेव्हापासून रघुवंशी गटाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात २०१० ते २०१५ दरम्यान सत्ता स्थापन झाली होती.तेव्हढे वर्ष वगळता रघुवंशी गटाचेच वर्चस्व होते.आज झालेल्या मतमोजणीत
आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय प्राप्त करीत आपला गड शाबूत ठेवला.
मतमोजणी दरम्यान झाले वाद
नंदूरबार येथील आयटीआय हॉल मध्ये मतमोजणी सुरू असताना दरम्यान सोसायटी मतदार संघासाठी चुरशीची मतमोजणी सुरू असताना टेबल क्रमांक १ वर उमेदवारांना मिळालेले मतांचे २५ ,२५ चे गठ्ठे बनवण्यात आले होते.दरम्यान आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारांचे २५ मतांचे १४ गठ्ठे असताना कर्मचाऱ्यांनी नजर चुकीने १ गठ्ठा डॉ.गावीत यांच्या उमेदवारांच्या गठ्ठ्यात टाकले.ही बाब किशोर पाटील यांच्या लक्षात आली.त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली.यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.अखेर पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करीत वाद शांत केला.त्यानंतर मतमोजणी वेळी ढिसाळ नियोजनामुळे तीन ते चार दा वाद झाले.तसेच मतमोजणी संथ गतिने सुरू असल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.