नंदूरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५० टक्के सवलत घोषित केली आहे.घोषणेच्या अनुषंगाने आज दि. १७ मार्च २०२३ पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलतीची अंमबजावणी होणार आहे.याबाबत कालच याबाबत शासन निर्णय निघाला आहे.
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले.
त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात आली असून नियमावली देण्यात आली आहे यात
सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी / मिनी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन – आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई ( साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी ] बसेसमध्ये ५० टक्के सवलत दि.१७ मार्च २०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे.
सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील.
सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘ या नावाने संबोधण्यात येत आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत लागू आहे.
सदर सवलत शहरी वाहतूकीस लागू नाही.
ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५० टक्के सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५० टक्के सवलत दिली असल्याने ५० टक्के प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स.निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी. प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे.
सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० टक्के सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय-ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. ७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १०० टक्के सवलत अनुज्ञेय राहिल.६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय राहिल.
५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५० टक्के सवलत लागू राहिल असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.