नंदुरबार l प्रतिनिधी
लघु पाटबंधारे प्रकल्प रोझवा, पाडळपूर व सिंगसपूर ता. तळोदा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून येथील धरण 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गळीकोठार, रोझवा पुनर्वसन, रोझवा, तलावडी, प्रतापपूर,नवागाव, रांझणी, आमलाड, तुळजा या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नदी व नाला काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








