नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सव दौडचा समारोप अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, तळोदा उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत झाला.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत 75 कि.मी. अमृत महोत्सव दौडला दि. 21 जुलै 2022 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली होती. अमृत महोत्सव दौडचा पहिला टप्पा हा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे ते उमदे खुर्द असा 5 कि.मी. चा होता. अमृत महोत्सव दौडच्या पहिल्या टप्प्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे स्वतः सहभागी झाले होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत अमृत महोत्सव दौडने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून सुरुवात करुन ती सारंगखेडा पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे मार्गे अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून मार्गक्रमण केले. अमृत महोत्सव दौडचे 18 टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आले होते. अमृत महोत्सव दौडमध्ये सहभागी झालेले पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी प्रत्येक टप्पा यशस्वीरीत्या पार केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर वृक्षारोपण केले त्याचप्रमाणे हर घर तिरंगा या राष्ट्रीय कार्यक्रमाचे महत्व जनतेला पटवून देवून जनतेच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण केली. अमृत महोत्सव दौडमध्ये सहभागी असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी 75 कि.मी. दौडसह एकुण 163 कि.मी. धावण्याचा सराव केला. अमृत महोत्सव दौड ही ज्या ज्या गावी पोहोचत होती त्या त्या गावातील प्रतिष्ठीत नागरिक. शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी हे दौडमध्ये सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारांचे फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून स्वागत करीत होते.
दि.14 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सव दौडला अक्कलकुवा उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे हस्ते मोदलपाडा ता. तळोदा येथून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. अमृत महोत्सव दौडने मोदलपाडा ते अक्कलकुवा पोलीस ठाणे असे 10 कि.मी. अंतर पार पाडून 75 कि.मी. चा टप्पा पूर्ण केला, अमृत महोत्सव दौडमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे स्वत: सहभागी झाले होते. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इतर 14 पोलीस अधिकारी व 37 पोलीस अमंलदार यांचेसह 100 शालेय विद्यार्थी हे देखील हातात तिरंगा झेंडा घेवून दौडमध्ये सहभागी होते.
अमृत महोत्सव दौड चालू असतांना रस्त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये अमृत महोत्सव दौडचे चित्रीकरण करीत होते, तसेच टाळ्या वाजवून व फुलांचा वर्षांव करुन दौडमधील पोलीस अधिकारी, पोलीस अमलदार व शालेय विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत होते.
75 कि.मी. अमृत महोत्सव दौडचा समारोप झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते अमृत महोत्सव दौडमध्ये पहिले तीन क्रमांक प्राप्त केलेले 3 पुरुष पोलीस अमलदार व 3 महिला पोलीस अमंलदार यांचा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अमृत महोत्सव दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारांना देखील भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
तळोदा उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेला 75 हजार वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणे सोपे नव्हते आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून पोलीसांनी 75 हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्यामूळे महसूल विभागाला देखील प्रेरणा मिळालेली असून ते देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलासारखेच काही उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगून त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतूक केले.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत अमृत महोत्सव दौडच्या समारोप प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेले विविध उपक्रमांची संकल्पना जरी त्यांची असली तरी ते उपक्रम यशस्वी होण्यामागे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे योगदान महत्वाचे आहे. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राबविण्यात आलेले हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड, 75 हजार वृक्षारोपण, 3 व 6 आसनी रिक्षांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षांच्या हार्दीक शुभेच्छा या आशयाचे बॅनर्स इत्यादी कार्यक्रमांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व नंदुरबार जिल्हा पोलीस दलास सहाय्य केले.अशा सर्व प्रतिष्ठीत नागरिक, शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थीनी, सर्व शासकीय विभागांचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले, त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या पुरुष पोलीस अमलदार, महिला पोलीस अमलदार व अमृत महोत्सव दौडमध्ये सहभागी झालेले पोलीस अधिकारी व अमलदारांचे अभिनंदन करुन कौतूक केले.
अमृत महोत्सव दौडच्या समारोप कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील. तळोदा उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष. अक्कलकुवा उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, तहसिलदार, अक्कलकुवा सचिन म्हसके, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांचेसह इतर पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.








