नंदूरबार l प्रतिनिधी
जुलै महिना सुरु झाला तरी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पाऊस पडावा यासाठी धानोरा ता.नंदूरबार गावातील सर्व ग्रामस्थांनी आज गावशिवच्या बाहेर जावून गावाबाहेरच स्वयंपाक करुन भोजन केले.
नंदूरबार तालुक्यातील धानोरा येथे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उदभवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस यावा म्हणून गावकर्यांमार्फत देवाला साकडे घालण्यासाठी मारूती मंदिरात रात्रभर भजन कीर्तन करण्यात आले.
सकाळी संपूर्ण शिवबंदी (गावबंद) करुन शेतात किंवा शिवच्या बाहेर जाऊन भोजन करण्यात आले. मारुती मंदिराजवळ सर्व ग्रामस्थ जमा होऊन परंपरेनुसार ढोल हे पारंपारिक वाद्यांचा गजराने आदिवासी नृत्याची जोड धरून अबाल-वृध्दांनी ‘धोंडया धोंडया पाणी दे, साय माय पिकू दे’ म्हणत वरुण देवाला साकडे घातले.
गावशिवच्या बाहेर जाऊन तेथे निसर्गाची पुजा पुजारी करणसिंग वसावे, वासु वसावे यांनी केली. तेथे बेडकाचे लग्न लावण्यात आले. तेथे उपस्थित लोकांनी निसर्गाची पुजा करुन सर्वांना प्रसाद देण्यात आला.
लहान मुलींनी डोक्यावर घागर घेऊन पाणी मागीतले. पारंपारिक पद्धतीने देवाला साकडे घालण्यात आले व मारुतीला नदीचा गाळ लावण्यात आला व तुझ्या आंघोळीसाठी तर पाऊस पाड अशी विनंती करण्यात आली.
यावेळी गावातील सरपंच मनोज पाडवी, उपसरपंच मनोहर वसावे, सदस्य मोहन वसावे चेअरमन प्रभाकर वळवी, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन वसावे, ज्येष्ठ नागरिक तानाजी वसावे, अजनसिंग महाराज, देवीदास वसावे, करणसिंग वळवी, मोहन वसावे, उमाकांत वळवी, यशवंत वसावे, दादी वसावे, जेवू वळवी, फुलसिंग वळवी, सुफा वळवी, देविदास पवार, बाळू वळवी, अश्विन वसावे, प्रताप वळवी आदी उपस्थित होते.