नंदुरबार | प्रतिनिधी-

हर्बल कंपनी कडून ड्रॉ लागल्याचे आमीष दाखवून भगदरी ता.अक्कलकुवा येथील शेतकर्याची १४ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल ते १६ मे २०२२ दरम्यान रंजीत कानसिंग पाडवी (शेतकरी, रा.भगदरी वाहीफळी ता.अक्कलकुवा) यांच्या मोबाईलवर अलोक चौबे व रामप्रसाद पटेल नावाच्या व्यक्तींनी ९१६३०९८२०९ या मोबाईलवरुन संपर्क करुन
आपल्याला हर्बल कंपनीकडून १२ लाख ६० हजार रुपयांचा ड्रॉ लागला असल्याचे सांगितले. सदर रक्कम मिळविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल लागेल व टॅक्स भरण्यासाठी पाडवी यांना फोन पे करण्यासाठी ८१२७८९०८१० हा मोबाईल क्रमांक दिला.
त्यावर पाडवी यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर चौबे व पटेल यांना पाडवी यांनी स्टेट बँकेचे खाते (क्र३६८४०११७१९८ तसेच २००६८३६५२७२, ३७९५०४२५७०२, ४००५६५५९२७१९, ३४५४०५३०६५४ या अकाऊंटवर वेळोवेळी १४ लाख ४० हजार रुपये ट्रान्स्फर केले.
परंतू पाडवी यांना कोणत्याही प्रकारचे ड्रॉचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत रंजित पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोलगी पोलीस ठाण्यात रामप्रसाद पटेल व अलोक चौबे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६५ (सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.









