नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिमला येथून तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून आज विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात दूरदृश्य प्रणालीमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि ) कृष्णा राठोड,

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आर.पी.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी आदींसह विविध योजनांचे निवडक लाभार्थी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी भारताने दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधी, लसचा पुरवठा केला. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लडाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात व हिमाचल प्रदेशातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
तत्पूर्वी दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहेत. तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात, असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला, तसेच लाभार्थ्यांच्या काही अडीअडचणी आहेत का ते जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नागपुर या जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री अस्लम शेख, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.








