नंदुरबार l प्रतिनिधी
सामान्य नागरीकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे तसेच सामान्य जनतेच्या मनातील पोलीसांविषयी भिती दूर होऊन पोलीस व जनता संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी आज दि. 24 मे रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एकाच दिवसात तब्बत 106 तक्रारींचे निवारण करण्यात आले.
जनता दरबाराचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , नायब तहसीलदार , नंदुरबार बी . ओ . बोरसे,

विधी सेवा प्राधिकारणकडील विधीज्ञ ॲड . श्री . रोहन गिरासे , ॲड . श्रीमती सिमा खत्री , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर , जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव , पोलीस विभागातील व महसुल विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबाराचे कौतूक करत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले .
पोलीस दलाचे पर्यायाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सामान्य जनतेप्रती असलेल्या कर्तव्य भावनेची जाणीव सर्वांना करून देऊन नंदुरबार जिल्हा पोलीस दल सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नमूद केले .
सामान्य माणुस आज देखील प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसमोर येऊन मोकळेपणाने समस्या मांडण्यास घाबरतो . प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबतची सामान्य जनतेच्या मनातील भिती ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी प्रशासनाला देखील जनतेच्या समस्या सोडविणे सोईचे जाईल . नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये .
नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांनी कसलीही भिती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी . जनता दरबारमध्ये त्यांना आमंत्रीत केल्याबद्दल त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त करुन जनता दरबार भविष्यातही असाच सुरु राहील यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या .
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले की , गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून त्यांच्या कौटुंबीक शेतजमीनी विषयी , गुन्ह्यांशी संबंधीत व इतर समस्या / तक्रारी मांडत होते परंतु कार्यालयात बसून त्यांना तक्रारींचे निरसन करता येत नव्हते ,
पोलीस विभागाचे कामकाज अतिशय व्यस्त असते कधी कायदा व सुव्यवस्था तर कधी गुन्हे तपास तसेच दैनंदिन कामकाज त्यातच एखादा सामान्य नागरिक त्याची तक्रार किंवा समस्या घेऊन पोलीस ठाण्याला आला तर कामाच्या ओघात पोलीसांकडून त्याची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होत नव्हते .
पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच सत्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी आजचा पोलीस व जनता दरबार आयोजीत करण्यात आला आहे असे सांगितले .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबारासाठी नंदुरबार तालुका पोलीस हद्दीतील सुमारे 300 व स्त्रीया उपस्थित होते . सामान्य नागरिकांच्या समस्या / तक्रारी स्वतः पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नागरिकांच्या समस्या ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन ” जनता दरबार ” या अभिनव उपक्रमाची सुरुवात नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून केली . पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या 5 दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यात आला व पाचही दाम्पत्यांचे मनोमिलन करण्यात यश मिळविले .
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी पाचही दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या पाचही दाम्पत्यांनी पोलीस विभागाचे आभार मानले . तक्रारदार आत्माराम शंकर मराठे वय 80 यांचे काही दिवसांपूर्वी मुलगा व सुनेसोबत कौटूंबीक कारणावरून भांडण झाले होते त्यामुळे त्यांचा मुलगा व सुन यांना समज देऊन त्यांच्यातील वाद हा जनता दरबारामध्ये सोडविण्यात आला .
जनता दरबारामध्ये मोबाईल हरविल्याबाबत बऱ्याचशा तक्रारी मांडण्यात आल्या होत्या . त्यापैकी नंदुरबार पोलीसांनी 12 तक्रारदारांचे हरविलेले मोबाईल मुळ तक्रारदारांना नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या हस्ते परत करण्यात आले .
तक्रारदार श्रीमती मीनाबाई श्रीराम पाटील रा . होळ तर्फे रनाळा ता.जि. नंदुरबार यांचे मयत पती नामे श्रीराम साहेबराव पाटील यांनी भावांसोबत झालेल्या शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून आत्महत्या केली होती . त्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत मयताचे भावांविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता .
पतीच्या आत्महत्येनंतर देखील त्यांच्या भावांनी मीनाबाई पाटील यांना शेत जमीनीचा हिस्सा न देता धमक्या दिल्या होत्या . त्याबाबतचा अर्ज जनता दरबारात प्राप्त झाल्याने मा.पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे समक्ष मयताच्या भावांनी शेतीचा हिस्सा देण्याचे मान्य केले .
त्यामुळे श्रीमती मीनाबाई श्रीराम पाटील यांचा फार दिवसांपासून प्रलंबीत असलेला वाद जनता दरबाराच्या माध्यमातून मिटला . नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पातील तार चोरीचे बरेचसे गुन्हे मागील काही दिवसांमध्ये घडलेले होते ते गुन्हे नंदुरबार पोलीसांनी उघडकीस आणल्यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात नंदुरबार पोलीसांना यश आले आहे .
तसेच 2 लाख 3 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी सुझलॉन कपनीचे मॅनेजर सुमल यांना परत देण्यात आला .
सदर जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादाच्या 13 तक्रारी , शेत जमीनीविषयी 23 तक्रारी , हरविलेल्या मोबाईलबाबत 4 तक्रारी ऑनलाईन फसवणूक – 3 तक्रारी आर्थिक फसवणूक -7 तक्रारी , धमकी , शिवीगाळ करणे , मारहाण करणे या स्वरूपाच्या अदखलपात्र गुन्ह्यबाबत 33 तक्रारी , इतर विभाग ( महसुल व MSEB ) – 18 तक्रारी , माहिती मिळणेबाबत 10 तक्रारी , चारित्र्य पडताळणीचे 4 प्रकरण , पासपोर्ट पडताळणीचे 1 प्रकरणे असे एकुण 106 तक्रारी मांडण्यात आल्या होत्या . त्यापैकी 90 तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलीसांना यश आले .
यातील बहुतांशी तक्रारी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्वतः हाताळल्या . उर्वरीत 16 तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली असून त्या तक्रारींची अधीक चौकशी करून त्यावर देखील लवकरच निर्णय घेतला जाईल .
निरसन झालेल्या तक्रारींपैकी 1 प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेनुसार , 1 प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला तर 1 प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली .
याकामासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी विविध पथके तयार करुन ही सर्व प्रकरणे हाताळण्यास मदत केली .
उपस्थित नागरिकांनी या कार्याक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले व त्यांच्या तक्रारींचे निरसन झाल्याने त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले . सदर कार्यक्रमाची प्रास्तावीक उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केले .
सामान्य जनतेच्या समस्या / तक्रारीचे निराकरण करण्याचे काम मा . जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी स्वतः सोडविण्याबाबत सुरुवात केलेली आहे .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले . तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .








