नंदुरबार | प्रतिनिधी-

नंदुरबार शहरात सहा महिन्यांपुर्वी दिवसाढवळया झालेल्या घरफोडीच्या (crime) गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास व दहा हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कैदेचे शिक्षा (Nandurbar Court) नंदुरबार न्यायालयाने सुनावली आहे. मुख्य (Magistrate) न्यायदंडाधिकारी यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवून अवघ्या ४ महिन्यातच खटल्याची सुनावणी पूर्ण करुन निकाल जाहीर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा १० ते १.३० वाजेदरम्यान दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांच्या घराचे कुलूप तोडून २ लाख ३० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंदनगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचेदेखील घराचे कुलुप तोडुन ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमंतीचे सोने चांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख घरफोडी झाली.पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे एमएच १८ पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले. त्या वाहनाचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला.परंतु ते वाहन भरधाव वेगाने निघून गेले. पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडेस सोपविला होता.पथकाने इंदोर येथे १२ दिवस तसेच पूणे येथे सलग ८ दिवस मुक्काम करुन गुन्ह्यातील पळून गेलेल्या शैलू ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा (वय-४० रा.हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि.सिहोर मध्यप्रदेश),संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी, वय-४० रा.राजीव गांधी नगर, अयोध्या रोड, पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश) यांना पुणे येथून अटक करुन त्यांच्याकडुन गुन्ह्यातील १० लाख १० हजार रुपये किंमतीचे २१ तोळे वजनाचे सोन्याचेे, चांदीचे दागिने, १५ हजार रुपये रोख,२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवून अटक करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात ५० दिवसातच सादर केले होते.नमुद गुन्ह्यातील दोन्ही आरोपी सराईत असून मुख्य आरोपी शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा याच्याविरुध्द् मालमत्तेविरुध्द्चे ६९ तर त्याचा साथीदार संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी) याच्याविरुध्द् खूनाचा गुन्हा दाखल होता.
मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, जप्त मुद्देमाल आणि परिस्थितीजन्य पूरावे तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबींचा विचार करत दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले.मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवून अवघ्या ४ महिन्यातच खटल्याची सुनावणी पूर्ण करुन दोन्ही आरोपीतांना आज दि.४ मे २०२२ रोजी ५ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.नंदुरबार जिल्हा निर्मीतीनंतर प्रथमच मालत्तेविरुध्द्च्या घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीतांना शिक्षा झाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी केला. न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. सुनिल पाडवी यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार गणेश धनगर, पोलीस नाईक मनोज साळुंखे, गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे.









