नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार वातावरणात कमी झालेली आर्द्रता जिल्ह्यात पुढील ५ ते ७ दिवस कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीची जागतिक कारणे:-
गेल्या काही वर्षापासून वातावरणात वाढलेले हरितगृह वायूंचे विशेषत: कार्बन कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण, बेसुमार वृक्षतोड, शहरामध्ये वाढते प्रदुषण इत्यादी कारणांमुळे तापमानात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.
कमाल तापमान ४० अंश सें.च्या पुढे गेल्यास पिकात वाढ खुंटणे, फळगळ होणे, फळे काळी पडणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान वाढून आर्द्रतेचे प्रमाण घटून हवामान कोरडे राहत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्यास मदत होते, त्यामुळे झाडांतून पानांच्याद्वारे झपाट्याने पाणी बाहेर पडते व् पिकांची पाण्याची गरज वाढते. परिणामी झाडे वाळण्यास सुरुवात होते. केळी या फळपिकाची वाढ खुंटते, पाने करपतात, नवीन पाने उमलण्यास अडथळा होतो, काढणी अवस्थेतील घडांवर व फळांवर काळे चट्टे पडतात तसेच घड, फळे बारीक राहतात. त्यामुळे वजन घटते व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. उष्माचा स्ट्रोक बसल्यास जनावरे तसेच कोंबडया दगावन्याची शक्यता असते. उष्णता वाढल्याने जनावरांत जास्त ऊर्जा वापरली जाते. श्वसनदर वाढतो, भूक कमी होते, तहान वाढते, रवंथ कमी होतो, लाळ सुरू होते, तोंडाने श्वास सुरू होतो, नाकावाटे होणारा रक्तस्राव उष्णतेचा तीव्र परिणाम दर्शवतो.
उपाययोजनाः
पिकांना पुरेसे पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकांना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा पाणी द्यावे. जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो तो कमी राहावा यासाठी पिकांमध्ये तसेच फळबागांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या फळबागांमध्ये रोपांना शेडनेटच्या सहाय्याने सावली देण्याची व्यवस्था करावी कोवळ्या रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. जास्त तापमानामध्ये पिकांना रासायनिक खते देणे टाळावे.पाणी देण्यासाठी तुषार किंवा ठिबक पद्धतीचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनासाठी झाडांची वाळलेली पाने, वाळलेले गवत, गहू, ज्वारी ई. पिकांचे मळणीनंतर राहिलेले काड, उसाचे पाचट ई. चा वापर करावा. शेतकरी बांधवांनी शेतामधील कामे सकाळी करून घ्यावीत दुपारी शेतामध्ये काम करणे टाळावे. जनावरांना पुरेशे, शुद्ध व थंड पाणी पिण्यास द्यावे. जनावरांना पुरेसा प्रथिनेयुक्त आहार, हिरवा चारा आणि खनिज मिश्रण द्यावे. गोठ्याच्या छतावर गवताचा थर द्यावा. जेणेकरून प्रखर सुर्य किरणांमुळे छत तापणार नाही. जनावरे सावलीच्या ठिकाणी बांधावीत. शक्य असल्यास दिवसातून ४ ते ५ वेळा त्याच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना पाण्यात डुबू द्यावे. पोल्ट्रीच्या बाजूने बारदाणे लावावेत व त्यावर वारंवार पाणी शिंपडावे. तसेच पोल्ट्रीमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी.असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे कृषिहवामान शास्त्रज्ञ सचीन फड यांनी केले आहे.