तळोदा l प्रतिनिधी
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही सामाजिक संस्था ग्रामीण भागातील वंचित समुदायातील अनाथ, एकल पालकत्व, दुर्लक्षित, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षित, सक्षम व स्वावलंबी बनवून, त्यांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावावा या भव्य दिव्य उद्देश समोर ठेऊन सदरील संस्था नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील 12 वर्षांपासून काम करत आहे. भारत देशातील 4 कोटी 20 लाख विद्यार्थी हे माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत. ह्या विद्यार्थ्यांना दिशा दर्शक मार्गदर्शन नसल्याने परिणामी, हे विद्यार्थी दारिद्र्यामध्ये ओढले जात आहेत. यामुळे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट सन २००५ पासून अशाच विद्यार्थ्यांसाठी कार्य करतांना दिसत आहे.
माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ने दि. २९ व ३० जानेवारी २०२२ रोजी “मॅरेथॉन” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यावर्षी १००० विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. ह्या उद्देशाने “मी धावणार, ते शिकणार” या संकल्पनेच्या आधारे अनेक लाभार्थ्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. यावेळी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट नंदूरबार चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी भरत परदेशी, तळोदा प्रकल्प अधिकारी किशोर शिंपी, अक्कलकुवा सहाय्यक प्रकल्प अधिकारी भूषण बूनकर, धडगाव सहाय्यक प्रकल्प अधिकारी अभिमन्यू पाडवी, कांतीलाल पाडवी, राकेश वळवी, संजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वळवी, विलास पावरा, दिनेश भोये, प्रल्हाद वसावे व लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सदरील मॅरेथॉन तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, खापर, मोलगी येथील संस्थेच्या सेंटर ठिकाणी घेण्यात आली. यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला व शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा निर्धार केला आहे.